Manoj Jarange On Aditya Thackeray । मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये आज प्रचंड आक्रमक झालेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असून, त्यांना माझा बळी हवा आहे असा खळबळजनक आरोप जरांगे यांनी केला आहे.
तसेच मी आता फडणवीसांच्या बंगल्यासमोर जाणार असून, माझा जीव घ्या असे म्हणत मनोज जरांगे थेट व्यासपीठावरून खाली उतरले आहे. दरम्यान, ते सध्या मुंबईतील सागर बंगल्याकडे रवाना झालेत. । Manoj Jarange On Aditya Thackeray
आज अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी समाजाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
यावेळी त्यांनी “देवेंद्र फडणवीस मला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा म्हणत जरांगे प्रचंड आक्रमक झाले आहे. जरांगे यांची आक्रमक भूमिका पाहता गावकऱ्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आपली प्रतिक्रिया दिली असून शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, ‘मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होईलच. मात्र ज्यावेळी याची सुरुवात झाली त्यावर आपण बोलायला हवं, ज्यावेळी आंतरवाली सराटीत लाठीचार्ज झाला होता. अनेकांना जखमा झाल्या.
उपोषणाला बसलेल्या पहिल्या दिवसापासून सगळा प्रकार सुरु आहे. ज्यावेळी लाठीचार्ज झाला त्यावेळी इंडिया आघाडीची बैठक सुरु होती. एखाद्या ठिकाणी लाठीचार्ज झाला तर त्या परिसरातील पोलीस प्रशासनाची बदली केली जाते. तसं एसपींची बदली केली. मात्र एवढी मोठी आंदोलनं करण्यासाठी पोलिसांना आदेशाची गरज असते.
त्यांना आदेश देणारे जनरल डायर कोण आहेत? हे आपल्याला समजायला हवं. या घटनाबाह्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. कधीही आदेशाशिवाय आंदोलन उठवत नाही. त्यामुळे या संदर्भातील जनरल डायर नेमके मुख्यमंत्री आहेत की उपमुख्यमंत्री आहे, याचा शोध घेतला पाहिजे. असा सवाल त्यांनी उपस्थित केला.