Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावर त्यांनी प्रत्युत्तर देखील दिले होते. तसेच विधानसभेत मनोज जरांगे यांच्या वक्त्यावरून गदारोळ सुरू झाला होता. भाजप नेते आशिष शेलार यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठा आंदोलनातील हिंसक वक्तव्ये आणि हिंसक कृती यांची सखोल चौकशी एसआयटीमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर जरांगे यांच्या एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश दिले.
यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. मनोज जरांगे फक्त निमित्त असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच भाजपचे टार्गेट असल्याचं पटोले यांनी म्हटले आहे. त्यांचे हे विधान सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
पटोले म्हणाले, “महायुतीत जागा वाटपावरुन अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देऊन भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच टार्गेट केले आहे.”
“मनोज जरांगे अंतरवाली सराटीत उपोषण करत असताना मुख्यमंत्री शिंदे त्यांना जाऊन भेटले होते. त्यानंतर नवी मुंबईत जरांगेंचे उपोषण सोडले. मुख्यमंत्र्यांचा एक OSD सतत जरांगेच्या संपर्कात होता. जरांगे पाटील हे फक्त निमित्त असून भाजपचे खरे टार्गेट तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत,” असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.