भिवंडी – “दहीहंडीच्या दिवशी जेव्हा गोविंदा घरातून बाहेर पडतो त्यावेळी आई वडील मुलगा घरी कधी येईल याची वाट पाहत असतात. मात्र मुलासोबत झालेल्या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर आई-वडिलांना काय वाटत असेल हे त्यांनाच माहीत असते. त्यामुळे आपल्या तरुण पोरांना मृत्यूच्या दाढेत ढकलू नका,’ अशी भावनिक साद चौदा वर्षांपूर्वी सहाव्या थरावरून कोसळल्यानंतर अंथरुणाला खिळलेल्या नागेश भोईर या गोविंदाची आई नलिनी भोईर यांनी घातली आहे.
नागेशचा अपघात झाल्यानंतर त्याची विचारपूस करण्यासाठी ना सरकार फिरकले ना दहीहंडी आयोजक.सरकारकडून नोकरी किंवा कोणतीही मदत या गोविंदाला मिळाली नाही. नागेश गेल्या तब्बल 14 वर्षे तो आपल्या आजाराशी झुंज देत आहे. आता नागेशचे वय 38 असून तो गेल्या चौदा वर्षांपासून अंथरुणावरच आहे.
नागेशच्या उपचाराकरता मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे . सुरुवातीच्या काळात मित्रमंडळींनी मदत केली. परंतु जस जसा उपचाराचा खर्च वाढला त्यानंतर कोणीही विचारपूस करायला देखील फिरकले नाही. नागेश हा भिवंडी येथे राहत असून 2009 साली तो भिवंडी येथील टिळक चौकात दहीहंडी फोडताना सहाव्या थरावरून कोसळला होता. त्यात त्याच्या पाठीच्या मणक्याला जोरात मार लागला. ज्यामुळे तो आत्तापर्यंत आपल्या पायावर उभा राहू शकलेला नाही.
सरकार, आयोजकांकडून केवळ अश्वासने
दहीहंडी उत्सवात लागणारी उंच थरांची रोमांचक स्पर्धा आपण पाहतो. परंतु या गोविंदाची जबाबदारी घ्यायला ना सरकार तयार असते ना दहीहंडी आयोजक. तसेच दहीहंडी उत्सवात अपंगत्व आलेल्या गोविंदांना मंडळाच्या वतीने तसेच आयोजकांच्या व सरकारच्या वतीने देखील फक्त आश्वासनच दिली जातात. मात्र प्रत्यक्षात कोणी मदत देखील करत नाही अशी खंत देखील भोईर कुटुंबीयांनी व्यक्त करून दाखवली आहे.