Manoj Jarange Patil| देशभरात लोकसभा निवडणूकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. दिग्गज नेतेमंडळी विविध ठिकाणी जाहीर सभा घेत आहेत. लोकसभा निवडणुकीची तयारी एकीकडे सुरू असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. ६ जूनपर्यंत ओबीसीतून मराठा आरक्षण दिले नाही तर पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार आहे. याशिवाय मराठा समाज विधानसभेची तयारी करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?
“डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा. आम्ही यंदा राजकारणात नाही. उमेदवार दिला नाही किंवा कोणाला पाठिंबा दिला नाही. मात्र ६ जूनपर्यंत ओबीसीतून आरक्षण नाही दिले तर पुन्हा उपोषण करणार आहे. तसेच, मराठा समाज विधानसभेची तयारी करणार आहे. याचबरोबर, महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले,’ असे जरांगे म्हणाले.
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “मराठ्यांविषयी देवेंद्र फडणवीस यांना अतिप्रेम आहे. इतके प्रेम उफाळून येते की, त्यांचं की सांगता येत नाही. मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे. सात महिन्यांआधीचे गुन्हे काढले जात आहेत. मात्र, गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बढती दिली. त्यामुळे गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखी कामगिरी आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी केली. मनोज जरांगे आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले होते. त्यावेळी त्यांनी सरकारला हा इशारा दिला आहे.
हेही वाचा:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सलमान खानशी फोनवरून चर्चा ; पोलीस आयुक्तांना दिल्या ‘या’ सूचना