Manohar joshi – राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे कडवट शिवसैनिक मनोहर जोशी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे निधन झाले, ते ८६ वर्षाचे होते. कडवट शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू नेते अशी मनोहर जोशींची ओळख होती.कोकणात जन्मलेले जोशी शिक्षणासाठी मुंबईत आले आणि मुंबईकर होऊन गेले. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंध आल्याने मनोहर जोशींची राजकीय कारकीर्द सुरु झाली.
नगरसेवक, महापौर,आमदार,मुख्यमंत्री,खासदार,लोकसभा अध्यक्ष अशी सर्वच महत्वाची पदे जोशी सरांच्या वाट्याला आली. अगदी तसाच राजकारणातील वनवासाचा सामना देखील मनोहर जोशी यांना करावा लागला.
मनोहर जोशी यांनी मुंबईतून पहिल्यांदा नगरसेवक होऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्यावर वरदहस्त राहिल्याने ते आमदार आणि पुढे मुख्यमंत्री देखील झाले.शिवसेनेचे सरकार महाराष्ट्रातून गेल्यानंतर प्रमोद महाजन यांच्या रणनीतीने शिवसेनेकडून मनोहर जोशी हे खासदार झाले आणि त्यांनी लोकसभा अध्यक्षपदही भूषवलं. यादरम्यान मनोहर जोशी हे शिवसेनेतील क्रमांक एकचे नेते होते. मात्र यानंतर सेनेतील अंतर्गत राजकारण बदलत गेले आणि मनोहर जोशी साईडलाईन होत गेले.
उद्धव ठाकरे पक्षात सक्रिय
खरं तर मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेते. मात्र सेनेची राज्यातून सत्ता गेल्यानंतर पक्षामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हे सक्रिय झाले होते.त्याचदरम्यान उद्धव आणि राज यांच्यात संघर्ष सुरु झाला होता. सेनेतील जुने जाणकार असे देखील सांगतात कि त्यावेळी पक्षामध्ये उद्धव ठाकरे यांचा एक गट आणि पहिल्या फळीतील नेत्यांचा एक गट अशी स्थिती निर्माण झाली होती. पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये मनोहर जोशी,नारायण राणे असे नेते होते.याचदरम्यान मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरे यांच्यात खटके उडत असल्याच्या बातम्या देखील समोर येत होत्या.
बाळासाहेबांचं निधन आणि जोशी बाजूला
उद्धव ठाकरे यांनी पक्षात सक्रिय झाल्यानंतर अनेक महत्वाचे बदल करायला सुरुवात केली होती.२००० नंतर शिवसेनेला अनेक बड्या नेत्यांनी जय महाराष्ट्र देखील केला.याचदरम्यान उद्धव ठाकरे आणि मनोहर जोशी यांच्यात वाद सुरु असल्याच्या चर्चा देखील सुरु होत्या आणि त्यामुळेच जोशी सुरुवातीला हळूहळू राज्याच्या राजकारणापासून दूर गेले. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यानंतर झालेल्या दसरा मेळाव्यात ठाकरे आणि जोशी यांच्यात असलेला वाद स्पष्टपने दिसून आला होता.
दसरा मेळाव्यात जोशींना शिवसैनिकांचा विरोधात
बाळासाहेब ठाकरे यांचे २०१२ मध्ये निधन झाल्यानंतर २०१३ मध्ये शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरेंशिवाय दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात सेनेपासून दुरावलेल्या आणि उद्धव यांच्याशी अंतर्गत कलह असलेल्या मनोहर जोशींना थेट शिवसैनिकांनीच विरोध केल्याचे दिसून आले. हा विरोध इतका मोठा होता कि जोशींना मेळावा सोडून घरी परतावे लागले होते.
काय घडलं होत नेमकं त्यावेळी ?
मनोहर जोशी यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरून केलेल्या विधानामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यावर नाराज झाले होते. त्यानंतर दसरा मेळाव्याला येण्यापूर्वी लेखी माफीनामा द्या असे आदेश जोशी यांना देण्यात आले होते. मात्र जोशी यांनी माफीनामा न देता दसरा मेळाव्याच्या मंचावर हजेरी लावली होती. अशात मेळावा सुरु होताना शिवसैनिक त्यांच्याविरोधात घोषणा देऊन गोंधळ करू लागले अखेर जोशींनी चालू मेळाव्यात व्यासपीठ सोडले आणि ते घरी परतले.
या घटनेनंतर मनोहर जोशी हे जवळपास राजकारणातून आणि मातोश्रीपासून अलिप्तच झाल्याचे पाहायला मिळाले होते. उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे मतभेद असले तरी अखेरपर्यंत त्यांनी शिवसेना सोडली नव्हती.