पुणे, {प्रभात वृतसेवा} – पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधीने पुण्याच्या अनेक प्रश्नांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे बाजू मांडावी. धोरणे ठरवावीत, आवश्यकतेनुसार निधी आणावा हे जसे महत्त्वाचे आहे,
तसेच त्याने शहरातील नैसर्गिक वारसा स्थळे असलेल्या टेकड्या यांचे संवर्धन करण्यासाठी ठाम भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा वेताळ टेकडी बचाव कृती समितीने व्यक्त केली आहे. या मागणीसाठी १५ एप्रिल २०२३ अनेक नागरिक रस्त्यावरही उतरले होते.
या आहेत मागण्या
– भूजल पुनर्भरणाद्वारे पाण्याचा ताण कमी करण्यात आपल्या टेकड्या महत्त्वाच्या भूमिका बजावतात त्यामुळे भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असताना आपल्या टेकड्यांचे संरक्षण झाले पाहिजे, अशी समितीची मागणी आहे.
– आपल्या लोकप्रतिनिधींनी केंद्र सरकारच्या भूजल व्यवस्थापनावरील धोरणे आणि योजना पुणे शहरासाठी राबवल्या पाहिजेत.
– भूजल पुनर्भरण स्रोत म्हणून मोकळ्या सुविधांच्या जागा (अॅमिनिटी स्पेस) संरक्षित केल्या पाहिजेत.
– वेताळ टेकडीचे सुमारे ८०० हेक्टरचे क्षेत्र नैसर्गिक पावसाच्या पाण्याचे पाणलोट क्षेत्र निर्माण करते. तसेच अंदाजे एकूण संभाव्य भूजल साठवण ५.५ मिमी क्षमता असलेली भूजल पातळी भरते. या डोंगरमाथा-उताराला भूजल पुनर्भरण क्षेत्र म्हणून संरक्षित करणे आवश्यक आहे.
– पुण्यात २५० हून अधिक लहान ते मोठ्या प्रवाहांचे जाळे आहे. त्यापैकी बहुतेक ठिकाणी एकतर अतिक्रमण झाले आहे किंवा हे प्रवाह बुजवले गेले आहेत. हे प्रवाह पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे. अतिक्रमण काढणे, गाळ काढणे आणि सफाई करणे ही कामे प्राधान्याने करणे गरजेचे आहे.
– टेकड्यांवरील मानवनिर्मित जंगले जतन करण्याचे फायदे अनेक असल्याने ते जतन केले पाहिजेत.
– लोकप्रतिनिधींनी राज्य आणि स्थानिक प्रशासनाला मुख्य टेकड्यांमधून होणाऱ्या रस्त्यांना विरोध करावा.
– सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम करावी. पीएमपीला भक्कम आधार द्यावा आणि तिला शहराची मुख्य लाइफलाइन बनवण्याला मदत करावी.