जिल्हाध्यक्ष गारटकरांची माहिती : पक्षाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका
रेडा -राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्याबद्दल प्रसार माध्यमातून खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी सुरू असल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत, त्यामुळे पक्षाची नाहक बदनामी होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी मंगलदास बांदल यांना पक्षातून निलंबित केले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
इंदापूर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर बोलत होते. यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष अमोल भिसे, नगरसेवक अनिकेत वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बांदल यांच्याबद्दल पक्षाने गंभीर दखल घेतलेली आहे, प्राप्त झालेल्या प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून कारवाई केली जाणार आहे. पक्षाच्या प्रतिमेला जर धक्का लागत असेल तर, पक्ष स्तरावरून कारवाई तात्काळ केली जाते.
एखाद्या नेत्याचे विचार म्हणजे ते पक्षाचे विचार नसतात, अशा चुकीच्या नेत्यांच्या विचारांना आणि अपप्रवृत्तीला कधीही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष खतपाणी घालत नाही. याचाच भाग म्हणून पक्ष स्तरावरून मंगलदास बांदल यांचे निलंबन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान मंगलदास बांदल हे शिरूर लोकसभा मतदारसंघातील एक राजकीय वजनदार व्यक्तीमत्व आहे; मात्र सामाजिक कार्यापेक्षा ते गुन्हेगारी क्षेत्राशी निगडीत असलेल्या प्रकरणांमध्येच कायम झळकत असतात.
त्यामुळे ते राजकारणात नक्की समाजकारणासाठी आले की, गुन्हेगारी क्षेत्रात आपला दबदबा कायम राहावा म्हणून आले आहेत, असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पक्षामधीलच काय, पण सगळ्यांच राजकीय पक्षांमधील कार्यकर्त्यांना कायम सांगत असतात की, 20 टक्के राजकारण अन् 80 टक्के समाजकारण केले पाहिजे;
मात्र त्यांच्याच पक्षातील अन् तेही प्रदेश उपाध्यक्ष असेलेला नेता या 80 आणि 20 टक्क्यांमध्ये कोठेही दिसत नसल्याने पक्षाध्यक्षांच्या विचारांनाच “तिलाजंली’ दिली. उशिरा का होईना याची पक्षाने दखल घेऊन कारवाई केली, याबद्दल पक्षातील त्यांच्या विरोधकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पक्षनिष्ठेला तिलांजली
विधानसभा निवडणुकीत बांदल यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तिकीट हवे होते; मात्र ते मिळेल की नाही याची खात्री नसल्याने ते कधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत तर कधी शिवसेनेच्या नेत्यांसमवेत चर्चा करताना दिसून आले. त्यांच्या कार्यक्रमांप्रसंगी थेट त्यांच्या व्यासपीठावर दिसत असल्याने मंगलदास बांदल मनसेत, शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या “वावड्या’ कायम उडत होत्या. एवढे करूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना डावलून ऍड. अशोक पवार यांना तिकीट दिले होते.
यामुळे नाराज झालेल्या बांदलांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचे काम न करता थेट भाजपच्या उमेदवाराचे काम केले. त्यामुळे राजकीय दृष्ट्या अविश्वासू नेते अशीच त्यांची राजकीय कारकीर्द असल्याने तसेच आर्थिक दृष्ट्या संपन्न असल्याने ते कोणाशीही राजकीय वैर स्वीकारण्यास तयार असतात असाच त्यांचा इतिहास राहिला आहे.