श्रीकांत कात्रे
कोणताही व्यवसाय छोटा मोठा नसतो. कापड दुकानाचा व्यवसाय करणाऱ्या तृप्ती भोसले यांनी फुले व पूजा साहित्य विक्रीचा जोडधंदा सुरू केला. नंतर त्यांच्या कल्पकतेने व कष्ट करण्याच्या तयारीमुळे फुले व पूजा साहित्याचा व्यवसाय मुख्य बनून गेला. महिलांना काम देण्याच्या विचारातून जिद्द आणि मेहनतीने त्यांनी हा व्यवसाय वाढवला. स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक स्थिरता देताना इतर महिलांनाही त्यांनी रोजगार दिला….
घरी बसून काय करायचे असा विचार अनेकांच्या मनात येत असतो. तशी जिद्द दाखवून स्वतःची ओळख निर्माण करण्याची धमक काही जणांच्या अंगी असते. तृप्ती भोसले यांचेही असेच झाले. लग्नानंतर सहा महिने त्यांनी नोकरीही केली. मुले लहान असल्यामुळे नोकरी सहा महिन्यातच सोडली. पण नंतर घरात बसण्याऐवजी काही व्यवसाय करावा म्हणून घराजवळच कपड्याचे दुकान सुरू केले. लगेचच करोनाचे संकट आले. लॉकडाऊन सुरू झाले आणि अडचणीत भर पडली.
विक्री बंद झाली. दुकानाचे भाडेही अंगावरच पडले. फक्त मास्कची विक्री होत होती. दुकानाचे शटर बंद. मास्कबरोबर फुले व पूजेसाठी आवश्यक इतर साहित्य थोड्याफार प्रमाणात विकता आले. कापड विक्रीमध्ये ओळखीच्या ग्राहकांची उधारीही अडचणीत आणणारी होती. त्यामुळे फुलांबरोबरच अगरबत्ती, नारळ, हळद, कुंकू अशा पूजेच्या साहित्याची विक्री करण्याचा जोडधंदाच त्यांनी नंतर सुरू केला. पूजा साहित्य विक्रीच्या व्यवसायातच त्यांचा जम बसू लागला. त्यामुळे पूजा साहित्य विक्रीचा व्यवसाय हा आता त्यांचा मुख्य व्यवसाय बनला आहे आणि कापड विक्रीचा व्यवसाय जोडधंदा बनला आहे.
त्याशिवाय काही प्रमाणात दिवाळी, होळी, शिवजयंती अशा सण उत्सवाच्या निमित्ताने हंगामी व्यवसायही त्या करतात. पुण्यातील भोसरी येथे एकत्रित कुटुंबामध्ये राहणाऱ्या तृप्ती भोसले यांनी जिद्दीने आणि चिकाटीने या व्यवसायात यश मिळविले. आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. या यशामागे त्यांचे कष्ट मोठे आहेत. पूजेच्या साहित्याचा व्यवसाय करताना त्याची माहिती मिळवावी लागली. फुले आणण्यासाठी गुलटेकडीला पहाटे जायचे. पूजेचे साहित्य पुण्यातूनचआणायचे.
त्यासाठी सुरवातीला खूप अडचणी आल्यानंतर पूजा साहित्याची होलसेल विक्री करणारे बंधू भेटले. त्यांनी योग्य मार्गदर्शन व सहकार्य केल्यामुळे या व्यवसायातील नस त्यांना समजत गेली. मनात आत्मविश्वास निर्माण झाला. आपल्याकडे धार्मिक कार्यक्रमांना खूप महत्त्व असते. त्यामुळे रोजच्या ठराविक ग्राहकांबरोबरच अमावस्या, पौर्णिमा, देवदेवतांचे वार, सण, उत्सवाच्या काळात मागणी वाढत गेली. व्यवसाय स्थिर होत गेला. त्याचदरम्यान माणदेशी फाउंडेशनशी संपर्क आला.
माणदेशीच्या कार्यशाळा, प्रशिक्षणे यात सहभाग घेतला. त्यातून व्यवसाय वाढीसाठी आवश्यक टीप्स मिळत गेल्या. करोना काळात ऑनलाइन प्रशिक्षण मिळाले. अर्थकारण समजू लागले. बचत होऊ लागली. डीजिटल व्यवहार, मार्केटिंगचे तंत्रज्ञान समजले. व्यवसायाला बरकत येऊ लागली. पूजेच्या साहित्याबरोबरच महिलांसाठीचेपड्यांचविक्री जोडधंदा म्हणून त्या करीत आहेत.
शिवजयंतीच्यावेळी शिवप्रतिमा, ध्वज, तसेच होळीरंगपंचमीच्यावेळी रंग, पिचकाऱ्या अशा हंगामी वस्तूही त्यांच्या दुकानातून विक्री होऊ लागल्या. या साऱ्या व्यवसायातून सुरवातीला शंभर रुपयांची होणारी उलाढाल एक- दोन हजारांपर्यंत पोहचली. याशिवाय तृप्ती यांचा 20 महिलांचा बचत गट आहे. हळद पट्टी, कुंकू पट्टी बनविण्याचे काम त्यात पूजा साहित्यामध्ये बांगड्या, आरसा, मणी, टिकली अशा प्रकारचे साहित्यही असते. तसेच विविध प्रकारच्या पुड्या तयार करण्याचेकाम त्यांनी या महिलांमार्फत सुरू केले होते.
त्यामुळे महिलांनाही रोजगार मिळू लागला. आपल्यामुळे चार महिलांना हातभार लागला, याचे समाधान मिळू लागले, असे त्या सांगत होत्या. हाच व्यवसाय त्यांना वाढवायचा होता. मात्र, गेल्या दसऱ्याच्या दरम्यान त्यांच्या दिराचा अपघात झाला. त्यामुळे या कामाची गती मंदावली. मात्र, यापुढील काळात जूनपासून हा व्यवसाय होलसेल स्वरूपात वाढवायचा असल्याचे त्यांनी सांगितले.
यासाठी घरातील सदस्यांसह सर्वांचे सहकार्य मिळते. त्यांचे पती नोकरी करतात. त्यांचीही तृप्ती यांना मदत मिळते. भोसरीतून रोज पहाटे अडीच तीन वाजता पुण्यातील गुलटेकडी येथून फुल घेऊन यायचे. साडेचार- पाच वाजता दुकान सुरु करायचे. दिवसभर काम. फुलांचे हार तयार करणे, पुडे तयार करणे अशी दुसऱ्या दिवशीची कामे रात्री उशिरापर्यंत करून रात्री बारापर्यंत कष्टच कष्ट. पुन्हा पहाटेपासून रोजचे चक्र सुरू. व्यवसायात जम बसला. परंतु, त्यासाठी इतकी मेहनत घ्यावी लागते.
त्यांनी या कष्टातूनच स्वतःची ओळख निर्माण केली. कुटुंबाला आर्थिक स्थिरता मिळवून दिली. ती देताना केवळ स्वतःपुरता विचार केला नाही. परिसरातील गरजू महिलांना काम देण्यासाठीही त्यांचा प्रयत्न राहिला आहे. पुढील काळात हा व्यवसाय त्यांना वाढवायचा आहे. फुलांच्या सुगंधाने आणि पूजा साहित्याच्या पावित्र्यामुळे त्यांच्या व्यावसायिक वृत्तीला जणू चालनाच मिळाली. त्यामुळे त्या व्यवसायाबरोबरच कापड व्यवसाय, हंगामी वस्तूविक्रीचा व्यवसायालाही आकार आला. एखादी गोष्ट ठरविली की महिला जिद्दीने यश मिळवू शकते, हा आदर्शच त्यांनी निर्माण केला आहे