श्रीकांत कात्रे
आपल्या कुटुंबासाठी आपण काही तरी केले पाहिजे अशी जिद्द मनात बाळगून स्थिरस्थावर होण्यासाठी धडपडणाऱ्या वैशाली खेमनार यांनी अनेक अडचणींना तोंड दिले. एका व्यवसायाबरोबर दुसरा व्यवसाय, दुसऱ्यातून तिसरा अशी वाट चालत त्यांनी स्वतःचे एक
विश्व निर्माण केले. हा प्रवास सोपा नव्हता. संघर्षातूनच त्यांनी आपेले ध्येय प्राप्त केले. ग्रामीण भागातील महिला चिकाटीने कार्यरत राहते, कष्ट करते आणि त्यातून एक वेगळा आदर्श समाजासमोर निर्माण करते, हे तिच्या गावीही नसते. वैशाली यांनी मेहनतपूर्वक आणि हिमतीने आपल्या कुटुंबासाठी आर्थिक उन्नतीचा मार्ग गतीमान केला.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर गावच्या वैशाली खेमनार यांनी स्वतःच्या हिमतीवर स्वावलंबी बनण्यासाठी कष्ट घेतले. त्या कष्टाला नियोजनबद्ध दिश दिली. त्यामुळे त्यांनी एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायाचे गणित साधले. उत्पन्नातून बचत, बचतीतून गुंतवणूक करत ही किमया साधली. ग्रामीण भागात एखादी महिला या पद्धतीने आपला उत्कर्ष साधत असेल यावर विश्वास बसत नाही. अर्थातच माणदेशी फाउंडेशनच्या प्रोत्साहनाने आणि मार्गदर्शनाने त्यांनी ही मजल मारली.
पती, दोन मुलांसह त्या राहतात. सासरच्या गावीही मोठे कुटुंब. त्यामुळे दोन्हीकडच्या गरजा भागविण्यासाठी कसरत करावी लागत असे. वैशाली यांनी सुरवातीच्या काळात शेतात काम केले, मजुरीही केली. त्यानंतर त्या शिलाईकाम शिकल्या. शिवणकामातून काही उत्पन्न त्यांना मिळू लागले. त्याचदरम्यान माणदेशीमधून उद्योग उभारणाऱ्या सविता लोंढे यांची भेट झाली. वैशाली यांचे काम पाहून आणि जिद्द पाहून माणदेशीने त्यांना सहकार्य करण्याची भूमिका दाखवली.
करोना काळात त्यांना मास्क शिवण्याचे काम माणदेशीने दिले. त्यानंतर राख्या बनविण्याचे प्रशिक्षण देऊन मशीनद्वारे राख्या तयार करण्यासाठी मदत केली. मास्क आणि राख्या या दोन्ही व्यवसायांतून त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले. त्यातून त्यांनी बचत केली. बचतीतून आटा चक्की (घरघंटी) घेतली. या घरगुती स्वरूपातील व्यवसायातूनही उत्पन्न सुरू झाले. या काळात माणदेशीच्या मनीषा डिकले यांनी वैशाली यांच्या या जिद्दीला दिशा दिली. त्यातूनच पुन्हा एकदा बचतच त्यांच्या कामी आली. आणि त्यांनी भाडेतत्त्वावर एक दुकान गाळा घेत कटलरीचे दुकान सुरू केले.
हे दुकान सिन्नरच्या विजयनगरमध्ये त्या भागातील लोकांच्या गरजा पूर्ण करणारे ठरले. दुकानासाठी लागणारा माल कमी दरात चांगला कुठे मिळेल आणि ग्राहक वाढविण्यासाठी व्यवसाय कसा करावा, यासाठी माणदेशीच्या सारिका धारणकर व अनिता शितोळे यांनी सहकार्य केले. त्यामुळे हे कटलरीचे दुकानही त्यांच्या वाटचालीत मोठा आधार देत आहे. कॉस्मेटिक्स, ज्वेलरी, डेकोरेशनचे साहित्य, स्टेशनरी, शिलाईकामाचे मटेरिअल, गिफ्ट ऍटम अशा विविध वस्तूंनी हे दुकान सजले आहे.
ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या तत्पर राहत आहेत. माणदेशी फाउंडेशनने सुरवातीच्या काळात मास्क शिवण्यासाठी कापडापासून केलेली मदत, नंतर व्यवसायासाठी बिनव्याजी पाच हजार रुपये आणि वेळोवेळी केलेले मार्गदर्शन यामुळे आपली कष्ट करण्याची उमेद वाढली, असे त्या सांगतात. आता या व्यवसायातून बचत करून त्यांना दुकानाचा स्वतःचा गाळाही घ्यायचा आहे. मुलांचे शिक्षण आणि स्वतःचा दुकानाचा गाळा हे त्यांचे स्वप्न आहे. आतापर्यंत त्यांनी केलेल्या वाटचालीवरून त्या ही स्वप्नेही खरी करून दाखवतील, असा विश्वास त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता.
मला कुटुंबासाठी काही केले पाहिजे, या विचारातून एखादी महिला जिद्दीने आपले कर्तृत्त्व सिद्ध करते, याचे वैशाली खेमनार या उदाहरण आहेत. त्याशिवाय येणारा पैसा पैशाला कसा जोडायचा याचे गणित त्यांनी साध्य केले. अशी बचत करायची असते आणि बचतीतून आपली एकेक स्वप्न पूर्ण करायची असतात, असे भल्याभल्यांनाही जमणे अशक्य वाटते. मात्र, हीच गोष्ट वैशाली यांनी सहजतेने शक्य केली. त्यामागे कुटुंबासाठी लढण्याचा आणि स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता, हेच कारण आहे.
अर्थातच एका जागी बसून हे सारे करणे शक्य नव्हते. त्यासाठी कष्ट होते, मेहनत होती. ठिकठिकाणी फिरावे लागते, लोकांशी संवाद साधण्याचे कौशल्य लागते. संघर्ष करण्याची तयारी लागते. हे सर्व केल्यामुळेच त्यांना समाजात आपली ओळख निर्माण करता आली. म्हणूनच वैशाली यांचा हा प्रवास इतरांसाठीही अनुकरणीय असाच ठरणारआहे.