नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आकाशवाणीवरील कार्यक्रम “मन की बात’ पुन्हा एकदा सुरू होणार आहे. येत्या 30 जूनपासून “मन की बात’च्या दुसऱ्या मालिकेतील पहिला भाग प्रसारित होणार आहे. गेल्या महिन्यांत देशात नवे सरकार स्थापन होऊन मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आल्यानंतर पुन्हा हा कार्यक्रम सुरु होत आहे.
मायगोव्हडॉटइन या ट्विटर हॅंडलवर यासंबंधी ट्विट करण्यात आले आहे. यामध्ये जनतेला उद्देशून म्हटले की, मोदींनी पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार पुन्हा एकदा स्वीकारल्यानंतर मन की बात पुन्हा सुरू होत आहे. या कार्यक्रमासाठी तुमची माहिती, कल्पना तसेच सूचना पाठवाव्यात, 30 जून 2019 रोजी प्रसारित होणाऱ्या भागात त्या समाविष्ट होतील.
दुसऱ्या मालिकेतील हा पहिला भाग ऑल इंडिया रेडिआवरुन अर्थात आकाशवाणीवरुन प्रसारीत केला जाईल. पहिल्या मालिकेतील शेवटचा भाग लोकसभा निवडणुकीपूर्वी 24 फेब्रुवारी 2019 रोजी प्रसारीत झाला होता. त्यावेळी मोदींनी म्हटले होते की, रेडिओवरील हा कार्यक्रम माझ्यासाठी एक उत्कृष्ट अनुभव होता. मन की बातमधून जनतेचे प्रश्न आणि या प्रश्नांसंबंधीच्या संकल्पनेवर मोदी त्यांचे विचार मांडणार आहेत. त्यासाठी तुमच्या कल्पना शेअर करण्याचे निमंत्रण त्यांनी दिले आहे. यासाठी फोन लाईन्स 11 ते 26 जून या काळात खुल्या होतील.