प्रभाकर देशमुख; औद्योगिक वसाहत उभारण्याची ग्वाही
गोंदवले – माण-खटाव दहशतमुक्त व पाणीदार करायचा असून तरुणांना रोजगार मिळण्यासाठी पाच हजार एकरांमध्ये औद्योगिक वसाहत सुरू करण्याची ग्वाही माण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांनी दिली.
गोंदवले बुद्रुक गटातील किरकसाल, वाघमोडेवाडी, काळेवाडी, गटेवाडी, धामणी, ढाकणी, दीडवाघवाडी, वाकी, मनकर्णवाडी, दिवड, गोंदवले खुर्द या गावांमधील मतदारांशी प्रभाकर देशमुख यांनी संवाद साधला. पंचायत समिती सदस्य तानाजी कट्टे, बाळासाहेब माने, उद्योजक सर्जेराव भोसले, सुनील बाबर, बाळासाहेब पाटील, अशोक रणपिसे, अंगराज कट्टे, दिलीप तुपे, सचिन पाटोळे, दादासाहेब चोपडे, डॉ. राजेंद्र अवघडे, राजेंद्र रणपिसे, शिवाजी फडतरे, मधुकर सोनवणे, शिवाजी सोनवणे, दादासाहेब जाधव, उत्तमराव अवघडे, आत्माराम कदम, दत्ता रसाळ, पृथ्वीराज गोडसे, मनोज पोळ, बाळासाहेब सावंत, अमोल काटकर, बापूराव रणपिसे, विष्णूपंत अवघडे, अनुराधा देशमुख, मंदाकिनी कदम, सतीश मडके, दत्तात्रय काटकर, गौरीहर काटकर, ज्योतिराम काटकर, लक्ष्मण काटकर, ज्ञानदेव देशमुख, अर्जुन खाडे उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, माण-खटावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त असलेल्या उरमोडी प्रकल्पासाठी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, कै. अभयसिहराजे भोसले, कै.भाऊसाहेब गुदगे, कै. सदाशिवराव पोळ यांचे योगदान होते. मात्र, त्यांचा माजी आमदारांना विसर पडला आहे. या योजनेमुळे 18 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आतापर्यंत साडेतीन हजार हेक्टर जमिनीला पाणी मिळाले आहे. लोधवडे गाव पाण्याबाबत स्वयंपूर्ण असून टंचाई काळात येथून इतर गावांना पाणीपुरवठा केला जातो. स्वतःला “जलनायक’ समजणाऱ्यांना अजून बोराटवाडीचा टॅंकर बंद करता आला नाही.
दुष्काळी भाग असूनही येथील मुले स्पर्धा परीक्षेत चमकत आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी चांगले शैक्षणिक संकुल आजपर्यंत उभारता आले नाही. या भागात आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असतानाही चांगले क्रीडा संकुल का उभारता आले नाही. सुसज्ज रुग्णालय उभारता आले नाही. तुम्ही केलेला विकास कुठं आहे? दहा वर्षात फक्त सोळा टक्के गुण मिळाले असल्याने माजी आमदार नापास झाले आहेत. लोकांनी ही निवडणूक हातात घेतल्याने माझा विजय निश्चित आहे.
मेंढपाळांची आस्थेने चौकशी
या मतदारसंघात मेंढपाळांची संख्या मोठी असून त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगर आहे. त्यांचे जगणे सुसह्य करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे ध्येय आहे, असे देशमुख यांनी सांगितले. गोंदवले गटातील प्रचार दौऱ्यात काळेवाडी येथे देशमुख यांना काही मेंढपाळ मेंढ्या चारताना दिसले. देशमुख यांनी लगेच गाडी थांबवून मेंढपाळांची आस्थेने चौकशी केली. चारापाण्याची स्थिती, मुले काय करतात अशी विचारपूस केली. मेंढपाळ व त्यांच्या मुलांसाठी नवनवीन योजना, पूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योग उभारण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.