कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारवर चांगलाच निशाणा साधलाय. याबाबत बोलताना बॅनर्जी यांनी, आम्ही शेतकऱ्यांसोबत असून तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात यावेत अशी मागणी केली आहे. पश्चिम बंगाल सरकारने कृषी कायदे बरखास्त करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावत कृषी कायद्यांविरोधात ठराव मंजूर केला आहे.
दरम्यान, विधानसभेत कृषी कायद्यांविरोधातील चर्चासत्रादरम्यान बोलताना ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ‘दिल्ली पोलिसांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले. जर हे बंगालमध्ये झाले असते तर अमित भैय्यांनी, सरकारने पायउतार व्हावे अशी मागणी केली असती.’
त्या पुढे म्हणाल्या, ‘आम्ही शेतकऱ्यांसोबत असून हे कायदे मागे घेण्यात यावेत अशी आमची मागणी आहे. हे कायदे जबरदस्तीने लागू करण्यात आले आहेत. मोदी सरकारने दिल्लीतील हिंसाचाराची परिस्थिती अत्यंत निष्काळजीपूर्वक हाताळली. दिल्लीत जे झाले त्यासाठी भाजप जबाबदार आहे. आधी दिल्ली सांभाळा मग बंगालचा विचार करा.’
तत्पूर्वी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी देखील दिल्ली हिंसाचारासाठी मोदी सरकार व गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार असल्याचा आरोप लगावला होता. लालकिल्ल्यात घुसलेले आंदोलक भाजपचे हस्तक असल्याचंही चिदंबरम म्हणाले होते.