कोलकाता – चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 लॅंडिंगची ऐतिहासिक कामगिरी भारताने बुधवारी साजरी केली. त्याचवेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया देताना केलेली संदर्भाची चूक हा विनोदाचा नवा मुद्दा बनला आहे. चांद्रयान-3 लॅंडर चंद्रावर पोहोचण्यापूर्वी कोलकाता येथे एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी अंतराळवीर राकेश शर्माऐवजी बॉलीवूड अभिनेता-चित्रपट निर्माता राकेश रोशन यांचा उल्लेख केला. त्यानंतर हा विषय सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “पश्चिम बंगालच्या जनतेच्या वतीने मी इस्रोला माझ्या आगाऊ शुभेच्छा पाठवते. याचे श्रेय वैज्ञानिकांना गेले पाहिजे; श्रेय देशाला गेले पाहिजे. राकेश रोशन चंद्रावर उतरले तेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना “अंतराळातून भारत कसा दिसतो?’ हे विचारले होते. वास्तविक, भारतीय वायुसेनेचे तत्कालीन पायलट विंग कमांडर राकेश शर्मा हे सोव्हिएत युनियनच्या सोयुझ टी-11 मिशनचा भाग म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले होते.
अंतराळवीराने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी थेट टेलिव्हिजन न्यूज कॉन्फरन्स दरम्यान अंतराळातून संवाद साधला. तेव्हा इंदिरा गांधींनी राकेश शर्मा यांना विचारले होते, “तुम्हाला वरून भारत कसा दिसतो?” (अंतराळातून भारत कसा दिसतो?) त्यांनी कवी इक्बालच्या प्रसिद्ध ओळींचा हवाला देऊन उत्तर दिले आणि ते म्हणाले, “सारे जहॉं से अच्छा’ (संपूर्ण जगापेक्षा चांगले). पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची चूक सोशल मीडियावर व्हायरल झाली.
चांद्रयान-3 वर विचित्र विधान करणाऱ्या ममता बॅनर्जी या एकमेव नेत्या नाहीत. राजस्थानच्या एका मंत्र्याने चांद्रयान-3 मोहिमेच्या “प्रवाशांचे” अभिनंदन केले. राजस्थानचे क्रीडा मंत्री अशोक चंदना यांनी सांगितले की, “जर आम्ही यशस्वी झालो आणि सुरक्षित लॅंडिंग केले, तर मी प्रवाशांना सलाम करतो. आपल्या देशाने विज्ञान आणि अवकाश संशोधनात एक पाऊल पुढे टाकले आहे, त्याबद्दल मी देशवासीयांचे अभिनंदन करतो.