मुंबई – इस्रोच्या महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयान-3′ मोहिमेतील अंतिम टप्प्यामध्ये विक्रम लॅंडरने चंद्राच्या भूमीवर यशस्वीपणे लॅंडिंग केले. भारताने चांद्रयान-3 मोहिमेच्या निमित्ताने जगात इतिहास घडवला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश असून चंद्रावर यशस्वीरित्या यानाची सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनला आहे.
भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होत. आणि अखेर काल बुधवारी 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयानाने यशस्वी लँडिंग केले. यानंतर देशभरात मोठा जल्लोष करण्यात आला. या मोठ्या कामगिरीनंतर इस्रोचं संपूर्ण जगातून कौतुक होत आहे.
दरम्यान, देशासाठी गौरवशाली असलेली मोहीम यशस्वीरित्या पार पडल्यावर चंद्रावरील पाठवण्यात आलेल्या ‘प्रज्ञान’ रोव्हरच्या कॅमेऱ्यामध्ये काढलेले काही फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. अनेकांच्या इंस्टाग्राम आणि वॉट्सअप स्टेटसला हा फोटो पाहायला मिळत आहे.
या व्हायरल फोटोमध्ये असं दिसून येत आहे की, ‘भारताच्या रोव्हरच्या पाऊलखुणा चंद्रावर कायमस्वरुपी उमटल्या आहेत. चंद्रावर कोणत्याही प्रकारचं वातावरण नाही, त्यामुले या खुणा कधीही नाहीशा होणार नाहीत,’ अशा आशयाचा संदेश त्या व्हायरल फोटोसोबत प्रसारित करण्यात येतोय.
या फोटोमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर भारताचा अशोकस्तंभ आणि त्याखाली इस्रोचा लोगोदेखील छापलेला दिसतोय. मात्र, या फोटोची पडताळणी केली असता, हा दावा साफ खोटा ठरला आणि इस्रोने असा कोणताही फोटो शेअर केलेला नाही. तुम्ही हा फोटो बारकाईने पाहिला असता, त्याखाली ज्याने हा फोटो बनवलाय त्याचे नाव स्पष्टपण दिसू शकते. आनंदाच्या भरात भारतीय लोक हा फोटो इंस्टाग्राम आणि वॉट्सअप ला शेअर करत आहेत.