मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री बॅनर्जी बुधवार,1 डिसेंबर रोजी मुंबईतील काही बड्या उद्योगपतींनाही भेटू शकतात. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा उद्योगपतींच्या भेटीचा उद्देश पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक वाढवणे हा आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी युतीचे सरकार आहे. या आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे मित्रपक्ष आहेत. तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आलेल्या ममता बॅनर्जी या आघाडी सरकारमधील दोन्ही सदस्य पक्षांच्या प्रमुखांची भेट घेणार आहेत. मात्र त्या काँग्रेस नेत्यांना भेटणार नाहीत. मुंबई दौऱ्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीच भेट घेणार असल्याचे तृणमूल काँग्रेसच्या सुत्राकडून कळाले आहे.
यापूर्वी काँग्रेसने बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीपासूनही टीएमसीने स्वतःला पूर्णपणे दूर ठेवले होते. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच TMC सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिले नाही आणि आता टीएमसीने मंगळवारी बोलावलेल्या बैठकीलाही उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.