नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात तृणमुल कॉंग्रेसचे कार्यकर्ते सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा जोरदार विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी ममता बॅनर्जीं यांच्यावर सडकून टीका केली आहे. विजयवर्गीय यांनी ममता बॅनर्जी यांनी मानसिक संतुलन गमावले आहे, अशा शब्दात बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. याचबरोबर त्यांनी ममता यांनी डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घेण्याची आवश्यकता असल्याचेही म्हटले आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विद्यार्थांनी सीएए विरोधात लोकशाही मार्गाने विरोध सुरू ठेवायला हवा असे म्हटले होते. शिवाय, आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या मंगलौर येथील एका युवकाच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत करणार असल्याची देखील त्यांनी घोषणा केली होती.
सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्यात आल्यानंतर घुसखोर ओळखले जातील व त्याचा मतपेटीवर परिणाम होईल, ही ममता बॅनर्जी यांना भीता आहे. शिवाय, त्या आपला आधार गमावत आहेत, म्हणूनच त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. यामुळे त्या अशाप्रकारची कृत्य करत आहेत, त्यांना वैद्यकीय तपासणीची आवश्यकता आहे. असे कोलकाता येथील रॅलीप्रसंगी भाजपा नेते विजयवर्गीय म्हणाले आहेत.