कोलकाता : सुधारित नागरिकत्व कायद्याचा (का) फेरविचार करा आणि एनपीआर, एनआरसीची सक्ती पश्चिम बंगालंध्ये करू नये अशी मागणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन केली. गेले काही दिवस ममता आणि केंद्र सरकारच्या यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीबाबत उत्सुकता होती.
या बैठकीनंतर सुमारे 15 मिनिटांत बॅनर्जी यांनी माध्यमांना याची माहिती दिली. त्या म्हणाल्या, केंद्राकडून राज्याला 38 हजार कोटी रूपये येणे आहे. ते तातडीने अदा करावे, अशी मागणी केली. मोदी यांची ही सदिच्छा भेट होती. पंतप्रधान आणि राष्ट्रपती येथे आल्यावर राजशिष्टाचाराप्रमाणे मी त्यांची भेट घेते.
केंद्र सरकारकडून राज्याचे 28 हजार कोटी रुपये येणे आहे. बुलबुल वादळाच्या नुकसानभरपाई पोटी जाहीर केलेली सात हजार कोटी रूपयांची रक्कम द्यावी, अशी मागणी केली. ही माझ्या राज्याची मागणी आहे. त्यामुळे आम्हाला ही रक्कम हवी आहे ,असे सांगितल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
का, एनपीआर आणि एनआरसीला असणारा माझा विरोध मी स्पष्टपणे नोंदवला. या तिघांविरोधात जनतेत व्यापक असंतोष असल्याचे त्यांना सांगितले, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.