कोलकता – राष्ट्रीय स्तरावर विरोधकांचे नेतृत्व करण्याची आकांक्षा आणि तृणमूल कॉंग्रेसचा देशभर विस्तार करण्याचे स्वप्न बाळगून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही काळापूर्वी जोरदार मोहीम हाती घेतली. मात्र, पार्थ चटर्जी प्रकरण त्या मोहिमेतील मोठा अडथळा ठरण्याची चिन्हे आहेत.
सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर ममतांना संपूर्ण देशाचे राजकीय अवकाश खुणावू लागले. त्यातून त्यांनी बंगालबाहेर तृणमूलचा विस्तार करण्याची महत्वाकांक्षी योजना हाती घेतली. इतर राज्यांमधील नेते तृणमूलमध्ये दाखल होऊ लागल्याने ममतांची मोहीम व्यापक बनू लागल्याचे दिसू लागले. अशात चटर्जी प्रकरणाने डोके वर काढल्याने त्या मोहिमेचा वेग थंडावण्याची शक्यता बळावली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात अडकलेल्या चटर्जी यांना अटक झाली. चटर्जींची निकटवर्तीय असलेल्या महिलेकडे प्रचंड रोकड सापडली. त्यामुळे केवळ बंगाल सरकारच्याच नव्हे तर ममतांच्या प्रतिमेलाही तडे गेले.
त्यातूनच ममतांवर त्यांचे विश्वासू सहकारी असणाऱ्या चटर्जी यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची वेळ आली. साधे राहणीमान ही ममतांची ओळख. लढवय्यापणाबरोबरच त्या राहणीने ममतांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. पण, चटर्जी प्रकरणात समोर आलेली रोकड ममतांच्या प्रतिमेशी पूर्ण विसंगत स्वरूपाची आहे. त्यामुळे ममता आणि तृणमूलला घेरण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे.
मागील वर्षीची विधानसभा निवडणूक जिंकत तृणमूलने सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी बंगालची सत्ता काबीज केली. तृणमूलच्या विजयामुळे त्या राज्याची सत्ता मिळवण्याचे भाजपने स्वप्न भंगले. त्यानंतर बंगाल भाजपमधील धुसफूस वाढल्याने तो पक्ष काहीसा नामोहरम झाल्याचे वाटू लागले. मात्र, चटर्जी प्रकरणाने ममतांशी लढण्यासाठी भाजपला बळ मिळणार आहे.