नवी दिल्ली – ममता बॅनर्जी भाजपाच्या एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. त्या भाजपला खूश करण्यासाठी आणि भाजपाचे एजंट म्हणून काम करण्यासाठी कॉंग्रेसच्या विरोधात असे बोलत आहेत. त्या चर्चेत राहण्यासाठी अशा गोष्टी बोलतात. वेड्याला प्रत्युत्तर देणे अयोग्य आहे.
कॉंग्रेसकडे भारतभर 700 आमदार आहेत. हे ममतांकडे आहेत का? विरोधी पक्षांच्या एकूण मतांपैकी 20 टक्के मते कॉंग्रेसकडे आहेत. ही त्यांच्याकडे आहेत का? असा सवाल अधीर रंजन चौधरी यांनी केला.
चौधरी यांनी शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका केली. कॉंग्रेस नसती तर ममता बॅनर्जींसारख्या व्यक्ती जन्माला आल्या नसत्या हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे त्यांनी म्हटले आहे. भारतातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेसवर अवलंबून राहण्यात कोणताही अर्थ नसल्याचे ममतांनी म्हटले होते. त्यावरून चौधरींनी हा निशाणा साधला आहे.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या उत्तर प्रदेशसह चार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाच्या मोठ्या विजयानंतर आणि पंजाब राज्य आम आदमी पक्षाकडून पराभूत झाल्यामुळे कॉंग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी टिप्पणी केली होती.तुम्ही कॉंग्रेसविरोधात का भाष्य करत आहात? कॉंग्रेस नसती तर ममता बॅनर्जींसारखी व्यक्ती जन्माला आल्या नसत्या. त्यांनी हे लक्षात ठेवावे. भाजपाला खूश करण्यासाठी त्या गोव्यात गेल्या, त्यांनी कॉंग्रेसचा पराभव केला. तुम्ही कॉंग्रेसला कमकुवत केले. गोव्यात हे सर्वांना माहीत आहे, असे अधीर रंजन यांनी म्हटले आहे.