नगर – करोनाबाधित रुग्ण आढळल्याने माळीवाडा परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. मात्र, करोना विषाणूच्या नावाखाली महापालिकेचे अधिकारी या परिसरात अतिरिक्त त्रास देत आहेत. स्वत:ला अतिहुशार समजणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांमुळे माळीवाडा भागात आता नागरीक भुकेनेच मरतील, अशी स्थिती निर्माण झाल्याचा दावा शिवसेना नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केला आहे.
माळीवाडा भागात करोनाबाधित सापडल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून हा परिसर कंटेनमेटं झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे खरं पाहिले तर या भागात जीवनाश्यक सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापाकिा प्रशासनाची आहे. मात्र, केवळ हा परिसर कन्टेन्मेंट झोन जाहीर करुन अधिकारी मोकळे झाले आहेत. त्यानंतर या भागातील नागरीकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काहीच सुविधा ठेवलेल्या नाहीत, असा दावा बोराटे यांनी केला आहे.
या भागातील नागरीकांना आता गॅस सिलिंडर, औषधे मिळत नाहीत. गरोदर महिलांना रूटिन चेकअपला जाता येत नाही. त्यात नागरीकांना या सुविधा कशा उपलब्ध होतील, याची पूर्तता करण्याऐवजी महापालिकेचे अधिकारी लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत, असा दावाही बोराटे यांनी केला. माळीवाडा भागाची अंदाजे लोकसंख्या 15 हजार आहे. दोन महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये आधीच या भागातील लोकांचे कंबरडे मोडलेले आहे. असे असताना नगर महापालिका लोकांचे कंबरडे मोडण्याची सुपारी घेतल्यासारखी वागत आहे. या भागातील पाच स्वस्त धान्य दुकाने बंद आहेत. त्यातून नागरीकांना धान्य मिळत नाही. औषधे मिळत नाहीत. त्यामुळे लोकांनी आता जगावे की मरावे, अशी स्थिती निर्माण झाल्याची टीका शिवसेना नगरसेवक बोराटे यांनी केली आहे.