व्यावसायिक ग्राहकांना एक, तर घरगुती ग्राहकांना “वेगळा’ न्याय
महावितरणच्या भोंगळ कारभारावर चिंबळीकर नागरिकांमध्ये तीव्र संताप
चिंबळी (वार्ताहर) – येथे कधीच महावितरणचे घरगुती व शेती पंपाचे बील वेळेवर वेळेत मिळत नसल्याने बील वेळत भरले जात नाही, तरी देखील अवळी “बत्ती गुल’ करून ग्राहकांना वारंवार “शॉक’ देण्याचा पराक्रम महवितरण देत असल्याने चिंबळी (ता. खेड) येथील नागरिक महावितरणच्या गैरकारभारावर नाराजी व्यक्त करीत आहेत. तर सामन्य ग्राहकांना एक तर व्यावसायिक ग्राहकांना एक न्याय महावितरणकडून मिळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सकाळी वीज गेल्यास ती थेट सायंकाळीच येथे तर कधी-कधी मध्यरात्री वीज जाते. विद्युत कर्मचाऱ्याला फोन लावल्यास तो बंद असतो किंवा लागलाच तर काम सुरू असल्याचे सांगितले जाते. मुळात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असेल तर त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यात महावितरणला यश का येत नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. कंपन्यामध्ये किंवा एखाद्या गोडावून मधून वीज गेली तर विद्युत कर्मचारी त्यासाठी धावपळ करतात; मात्र रहिवासी भागातील वीज गेल्यास दिवसभर नागरिक संपर्क साधत असतात तरीही काम तात्काळ होत नाही. या मागे काय कारण की अर्थकारण दडले आहे का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
विद्युत कर्मचारी याबाबत नेहमी या भागात मोठ्या प्रमाणात रहदारी वाढल्याचे, त्यामुळे क्षमते पेक्षा अधिकचा ताण रोहित्रावर येत असल्याचे सांगतात. यामुळे फ्यूज उडतात, रोहीत्राची मागणी करून देखील ते लवकर मंजूर होत नसल्याचे सांगतात, यामुळे महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. तर काही नागरिक खासगीत सांगतात की महावितरणकडून काम करून घ्यायचे झाल्यास अवाच्यासव्वा पैसे मोजावे लागतात. गोडावूनवाले तो खर्च करतात; मात्र गावकीच काम सरकारी असल्याने त्याकडे
दुर्लक्ष होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
मी नवीन असून गेल्या महिनाभरापासूनच कारभार स्वीकाराला आहे. तरी या परिसरातील ज्या अडीअडचणी आहेत त्या जाणून घेऊन त्या तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच ज्या-ज्या ठिकाणी त्रुटी असतील त्याही दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे.
– विश्वास जगदाळे, सहायक अभियंता, महावितरण, चाकण
दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार?
चिंबळी परिसरातील रोहित्राच्या ठिकाणी महावितरणचे कर्मचारी-अधिकारी हजर नसतानाही कुणीही येऊन सर्रासपणे रोहित्रावरील डिपीवरून वीजपुरवठा खंडीत करीत आहे. जर वीजपुरवठा खंडीत करताना एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
…बिले तरी का भरायची
सध्याच्या वीज व्यवस्थेकडे पाहून चिंबळीकर यापूर्वी तरी चांगली व्यवस्था होती असे सांगतात. सध्याची कार्यपद्धती गोडावूनवाल्यांच्या फायद्याची झाली असून त्यांना लूटणारी आहे. गावाच्या कामाकडे सोयीने पाहिले जात आहे.कोणी तक्रार केल्यास कामांचा लोड असल्याचे सांगितले जाते. मुळात दिसवभर वीजच मिळत नसेल तर नक्की नागरिकांनी बिले तरी का भरायची असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.