जळोची -राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणात बदल करून विस्थापित शिक्षकांना प्राधान्य देण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे, अशी माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या (दि.31) पूर्वी करण्याचा आदेश शासनाने जिल्हा परिषदांना दिला आहे. (दि.27) फेब्रुवारी 2017 च्या जुन्या शासन निर्णयाप्रमाणे या बदल्या होत आहेत. जुन्या शासन निर्णयामुळे यावर्षी विस्थापित, रॅंडम राउंडमधील शिक्षक, समाणिकरणामध्ये तालुकाबाह्य बदली झालेले तसेच आंतरजिल्हा बदलीने आलेले शिक्षक यांना कोणतेही प्राधान्य मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे.
-प्राथमिक शिक्षक संघाच्या कोल्हापूर येथील महामंडळ सभेत शरद पवार यांच्या उपस्थितीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बदली धोरणात दुरुस्ती करून सोयीच्या बदल्या करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शासनाने संघटनांची भूमिका समजून घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची स्थापना केली होती.
अभ्यासगटाचा अहवाल प्रतीक्षेत असतानाच अचानक शासनाने (दि.31) जुलैपूर्वी बदल्या करण्यास सुचविले आहे. त्यामुळे पवार यांनी राज्य शासनाशी चर्चा करावी, अशी मागणी शिक्षक नेते संभाजीराव थोरात, प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांभारे, शिक्षक संघ पदाधिकारी यांनी केली आहे.