जिल्हा परिषदेचा कार्यकाल दि. 21 मार्च आणि पंचायत समित्यांचा कार्यकाल दि. 13 मार्चला संपल्यानंतर शासनाने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती केली होती. त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ओबीसी आरक्षण, करोना प्रादुर्भाव आदी कारणांमुळे ही प्रक्रिया झाली नव्हती.
न्यायालयातही याबाबत याचिका दाखल झाल्या होत्या. निवडणूक प्रक्रिया पावसाळ्यापूर्वी होईल अशी अपेक्षाही व्यक्त होत होती. यादरम्यान न्यायालयाने रखडलेल्या निवडणुका प्राधान्याने घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणांची प्रभाग रचना तयार करण्यात आली होती. विभागीय आयुक्तांनी गट, गणांवर शिक्कामोर्तब केल्यानंतर गुरुवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबतची अधिसूचना प्रसिध्द केली. नव्या प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या आता 64 वरुन 73 झाली असून पंचायत समितीची सदस्य संख्या 128 वरुन 146 झाली आहे. खंडाळा तालुक्यात गट, गण रचनेत फारसा बदल झालेला नाही. फलटण तालुक्यात यापूर्वी सात गट होते आता सांगवी व वाठार निंबाळकर हे आणखी दोन गट वाढले आहेत.
गिरवी गटाची फेररचना करुन आता कोळकी गट तयार झाला आहे. माण तालुक्यात गट आणि गण रचनेत म्हणावा असा बदल झालेला नाही. खटाव तालुक्यात यापूर्वी सहा गट होते आता बुध आणि सिध्देश्वर कुरोली हे गट वाढले आहेत. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या खटाव तालुक्यात दोन गटांची आणि चार गणांची भर पडल्याने इच्छुकांमध्ये समाधान आहे. कोरेगाव तालुक्यात यापूर्वी पाच गट होते आता नव्या रचनेत एकंबे गटाची भर पडली आहे. ल्हासुर्णे गट रद्द होऊन कुमठे गटाची निर्मिती झाली आहे. जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मंगेश धुमाळ यांच्या गटात आता आणखी चुरस वाढणार आहे.
नव्या रचनेत मंगेश धुमाळ यांचे गाव असलेले सोनके हा गण झाला आहे. वाई तालुक्यात यापूर्वी चार गट होते आता बोपर्डी हा गट नव्याने वाढला आहे. या गटात बोपर्डी व शहाबाग हे गण वाढले आहेत. यशवंतनगर गटाऐवजी आता पसरणी गट अस्तित्वात आला आहे. महाबळेश्वर व जावळी तालुक्यात काहीही बदल झालेला नाही. सातारा तालुक्यात दहा गट कायम राहिले असले तरी गट आणि गणांची फेररचना करताना मोठी तोडफोड करण्यात आल्याने अनेकांच्या अडचणी वाढणार आहेत. पाटण तालुक्यात यापूर्वी सात गट कार्यरत होते आता नव्या रचनेत एक गट वाढणार आहे.
कराड तालुक्यात सर्वाधिक 14 गट
कराड तालुक्यात यापूर्वी 12 गट आणि 24 गण होते. नव्या प्रभाग रचनेत चरेगाव आणि वडगाव हवेली हे दोन गट वाढले आहे. तळबीड, चरेगाव, वडगाव हेवली, शेरे हे चार गण वाढले आहेत. कराड तालुका हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील असून पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऍड. उदयसिंह पाटील, भाजपचे अतुल भोसले यांचे गट सक्रिय आहेत. नव्या रचनेत गट आणि गणांची संख्या वाढल्याने इच्छुकांची संख्याही वाढणार आहे. एकंदर जिल्हा परिषदेत कराड तालुक्यातील सर्वाधिक सदस्य असणार असून आता आरक्षणाकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.