लोणंद -सध्या पुणे ते मिरजदरम्यान जुन्या ट्रॅकवरील विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले असून गुरुवार, दि. 2 जुन रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांकडून लोणंद ते आदर्की या मार्गावरुन दोन्हीकडून घेतलेली चाचणी यशस्वी झाल्याचे सांगण्यात आल्याने आता “महालक्ष्मी’, “कोयना’ आणि “महाराष्ट्र एक्सप्रेस’ या गाड्या विजेवर चालणार आहेत.
सध्या पुणे ते मिरज या 280 किलोमीटर मार्गावरील जुन्या ट्रॅकचे संपूर्ण विद्युतीकरण पूर्ण झाले असून दूहेरीकरणाचे आणि नवीन ट्रॅकवरील विद्युतीकरणाचे कामही वेगात सुरू आहे. दोन्ही ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरुन रेल्वे वाहतूक वेगवान होणार असुन या मार्गावरील वाहतूकही पुढील काळात वाढणार आहे. दरम्यान, मध्य रेल्वेकडून करण्यात आलेल्या विद्युतीकरणाची चाचणी यशस्वी झाल्याने या मार्गावरुन धावणाऱ्या गाड्यांना यापुढील काळात विजेवर चालणारे इंजिन जोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याआधीच मुंबई ते कोल्हापूर धावणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस 4 जुन पासून विजेवर धावणार असल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले होते. आता कोल्हापूर ते गोंदिया दरम्यान धावणारी महाराष्ट्र एक्सप्रेस आणि मुंबई ते कोल्हापूरदरम्यान धावणारी कोयना एक्स्प्रेस यांनाही विजेवर चालणारे इंजिन जोडण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. विद्युतीकरणामुळे यापुढे मुंबई ते कोल्हापूर हा प्रवास अधिक वेगवान होणार असून प्रवाशांच्या वेळेची बचत होणार असल्याने या मार्गांच्या विद्युतीकरणाबद्दल प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे.