माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा भाजप सरकारवर निशाणा
चेन्नई – काश्मीरमध्ये हिंदू बहुसंख्य असते तर कलम 370 हटवले असते का? असा सवाल माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी विचारला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. या निर्णयाचा विरोध दर्शवत पी. चिदंबरम यांनी भाजपावर टीका केली आहे. तसेच जम्मू-काश्मीर सध्या अस्थिर आणि अशांत आहे. मात्र भारतीय प्रसारमाध्यमे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आहे, असाही आरोप त्यांनी केला.
चिदंबरम म्हणाले, केंद्र सरकारकडून कलम 370 हटविल्यानंतर काश्मीरची परिस्थिती निवळली असल्याचे भासविले जात आहे. मात्र, ते खरे वास्तव नाही. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था अशांत काश्मीरची स्थिती कव्हर करत आहेत. मात्र, भारतीय प्रसार माध्यमे काश्मीरमध्ये जी अशांत स्थिती दाखवत नसेल तर याचा अर्थ तिथे सारं काही आलबेल आहे, असे होत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
यावेळी सात राज्यांमधील सत्तारुढ असलेल्या स्थानिक पक्षांवरदेखील त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. चिदंबरम म्हणाले की, लोकसभेत जरी आपल्याकडे बहुमत नसले तरी राज्यसभेत आम्हाला आमची बाजू लावून धरता आली असती. पण विरोधी पक्षांमध्ये भाजपबाबत असलेल्या भीतीमुळे त्यांनी कलम 370 हटवण्याच्या विधेयकाला विरोध केला नाही. सातही पक्षांनी (अन्नाद्रमुक, वायएसआर कॉंग्रेस, टीआरएस, बीजेडी, आप, तृणमूल कॉंग्रेस, जद(यू) ) आम्हाला सहकार्य केले नाही. त्यामुळे राज्यसभेतही भाजपने सर्वांना मात दिली, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, गत आठवड्यात केंद्र सरकारने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला कॉंग्रेसने कडाडून विरोध दर्शवाला होता. मात्र भाजपकडे खासदारांचे बहुमत असल्याने हे विधेयक हटवण्याचा प्रस्ताव एकमुखाने मान्य करण्यात आला. यासंदर्भात कॉंग्रेसने चर्चेची मागणी केली होती. या विधेयकाच्या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद तसेच अधीर रंजन चौधरी यांच्यातली खडाजंगीही पाहण्यास मिळाली होती.