नवी दिल्ली – मधल्या फळीत संघाचा डाव भक्कम करण्यासाठी ऋषभ पंतपेक्षा श्रेयस अय्यर हाच योग्य पर्याय आहे. मात्र त्याला दीर्घ काळ त्या स्थानावर खेळण्याची संधी दिली पाहिजे असे ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी सांगितले.
श्रेयसने वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात 68 चेंडूंमध्ये 71 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीचे कौतुक करीत गावसकर म्हणाले की, ‘पंत हा यष्टीरक्षक व फलंदाज म्हणून संघात आला आहे. ज्या स्थानावर महेंद्रसिंग धोनी खेळत असे, त्या 5 व्या किंवा 6 व्या स्थानावर पंतला पाठविले पाहिजे. अय्यरला चौथ्या क्रमांकावर पाठविले तर दोन्ही फलंदाजांना त्यांच्या नैसर्गिक खेळ करता येईल. जर भारताची सुरूवात चांगली झाली. विराट कोहली, शिखर धवन व रोहित शर्मा यांनी 40 ते 45 षटके खेळून काढली तर पंतला चौथ्या क्रमांकावर पाठविणे उचित होईल. मात्र पहिल्या फळीने 30-35 षटकेच खेळली तर अशा परिस्थितीत अय्यरला चौथ्या क्रमांकावर तर पंतला पाचव्या क्रमांकावर पाठविणे संघासाठी हितकारक होईल’.
अय्यरने यापुढेही असेच सातत्य दाखविले पाहिजे. त्याच्याकडे आक्रमक शैलीबरोबरच जबाबदारीने खेळण्याचीही क्षमता आहे. त्याने दुसऱ्या लढतीत कोहलीच्या साथीत सुरेख खेळ केला. कोहलीकडून त्याला प्रोत्साहन मिळाले पण त्याच्या साथीत खेळताना त्याला भावी करिअरसाठी मौलिक सूचना मिळाल्या आहेत. त्याचा फायदा त्याला भविष्यात निश्चित होणार आहे असेही गावसकर यांनी सांगितले.