जवळपास सात दशके चंदेरी दुनियेत मनापासून रमलेले ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाल्यामुळे मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा एक साक्षीदार अस्तंगत पावला आहे. सामान्यतः जुन्या जमान्यातील कलाकार आपल्याच भूतकाळात हरवून गेलेले असतात आणि वर्तमानकाळात सर्वत्र अधोगती झाली आहे, असे पुटपुटत आयुष्य कंठत असतात. परंतु देव यांनी अगदी अलीकडे आपला वाढदिवस नाचत-गात, साजरा केला आणि एका मनोरंजन वाहिनीच्या सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना, “मी शंभर वर्षे जगणार आहे’, असे अत्यंत जोषपूर्ण उद्गार त्यांनी काढले.
घायल वन्स अगेन, जॉली एलएलबी, पिपाणी, राजकारण, गलगले निघाले, अशा चित्रपटांतून देव अगदी आठ-नऊ वर्षांपूर्वीपर्यंत काम करत होते. एवढेच नव्हे, तर त्यांनी दूरचित्रवाणी मालिकांतूनही कामे केली आणि जाहिरात कंपनीची स्थापना करून त्यातही नाव कमावले. “सर्जा’सारख्या चित्रपटांचीही निर्मिती केली आणि देव हे सतत काळाबरोबर राहिले. मास्टर विठ्ठल, चंद्रकांत मांढरे, विवेक, रवींद्र महाजनी आणि रमेश देव हे मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत देखण्या व्यक्तिमत्त्वाचे नट. शिवाय पूर्णपणे निर्व्यसनी असल्यामुळे तसेच शरीराचे आरोग्य सांभाळल्यामुळे, देव हे शेवटपर्यंत देव आनंदसारखेच सडसडीत आणि उत्साही राहिले. देव यांचे मूळ घराणे राजस्थानातील असले, तरी त्यांचे बालपण कोल्हापुरातच गेले.
वडील वकील होते आणि न्यायदानात मदत झाली असल्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचे नाव “देव’ असे ठेवले. देव यांची जडणघडण कोल्हापुरातच झाली आणि एकदा मित्रांसमवेत जयप्रभा स्टुडिओत सहज गेले असताना, त्यांना पाहून दिग्दर्शक भालजी पेंढारकरांनी त्यांना “ये रे माझ्या मागल्या’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका दिली. या सिनेमातूनच देव यांनी आपली छाप पाडली. त्यानंतर सुवासिनी, वरदक्षिणा, भाग्यलक्ष्मी, राम राम पाव्हणं, एक धागा सुखाचा, साता जन्माचे सोबती अशा अनेक मराठी चित्रपटांमधून ते चमकले. मात्र “आंधळा मागतो एक डोळा’ यातील खलनायकाच्या भूमिकेमुळे देव यांच्या नावाची चर्चा होऊ लागली.
या सिनेमासाठी त्यांना साडेतीनशे रुपयांचे मानधन मिळाले होते आणि देव यांच्या रूपाने मराठी चित्रपटसृष्टीला नवा “प्राण’ मिळाला, असा त्यांचा गौरव होऊ लागला. “साता जन्मांचा सोबती’ या चित्रपटाद्वारे देव हे नायक बनले. विशेष म्हणजे, नलिनी सराफ यांची व देव यांची गाठही रेल्वेच्या डब्यात अत्यंत फिल्मी पद्धतीने झाली. दोघेही सिनेमात काम मिळावे म्हणून स्क्रीन टेस्ट देण्यासाठी गोरेगावच्या फिल्मिस्तान स्टुडिओत चालले होते. त्यानंतर या जोडीने साता जन्मांची सोबत करण्याचे ठरवले आणि नलिनी सराफ “सीमा देव’ बनल्या. रमेशदेव यांनी कोल्हापूरहून मुंबईला येऊन हिंदी चित्रपटसृष्टीत काम करावे, असे सीमा यांनीच त्यांना सुचवले होते.
त्याप्रमाणे सीमा यांना घेऊन ते मुंबईला आले आणि राजा परांजपे यांच्या एका हिंदी चित्रपटात देव यांनी भूमिका केली. त्याचबरोबर राजाभाऊंच्या मद्रासमधील “बाप बेटे’ या चित्रपटातही त्यांना संधी मिळाली. त्या काळात एकीकडे राजा गोसावी, आत्माराम भेंडे यांच्यासह देव यांनी अनेक नाटकांतून काम केले. लग्नाची बेडी, तुझे आहे तुजपाशी, प्रेमा तुझा रंग कसा, भावबंधन, उसना नवरा, गहिरे रंग, गुलाम, पैसे झाडाला लागतात, अकुलिना, लाल बंगली अशा कित्येक नाटकांत देव यांनी भूमिका केल्या. देव यांच्या चित्रपटांतील अभिनयावरही रंगाभिनयाची छाप होती. काहीशा कृत्रिम, नाटकी आणि ढोबळ पद्धतीने व्यक्तिरेखा रंगवण्याची त्यांची शैली होती.
“भिंगरी’सारख्या चित्रपटात देव यांनी संपत या एका गुंडाची भूमिका केली. तो भिंगरीच्या बापाला दारू पाजून तिला तमाशात नाचवतो किंवा “जैसे को तैसा मिला’ मध्येही त्यांची खलनायकाची भूमिका गाजली. पण तीदेखील भडकच होती. या उलट प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सईद मिर्झा यांचे वडील अख्तर मिर्झा दिग्दर्शित “मोहब्बत इसको कहते हैं’ या चित्रपटात शशी कपूर आणि नंदा असून, रमेश देव यांनी त्यात नायकाच्या मित्राची भूमिका केली आहे. शशी-नंदाचे परस्परांवर प्रेम असले, तरी तिचे लग्न रमेशशी होते आणि पुन्हा नायक तिच्या जीवनात आल्यानंतर, रमेशच्या मनात पत्नीबद्दल संशय निर्माण होतो.
परंतु ही व्यक्तिरेखा देव यांनी अतिशय साध्या व संयत पद्धतीने अभिनीत केली. हृषीकेश मुखर्जी यांच्या “आनंद’ मधील डॉ. प्रकाश कुलकर्णी ही व्यक्तिरेखा साकार करताना, हास्यप्रधान व कारुण्यमय प्रसंगांतही देव यांनी उत्स्फूर्त अभिनय केला. फणी मुजुमदार यांच्यासारख्या कसदार दिग्दर्शकाने देव यांना “आरती’ मधून संधी दिली आणि त्यातही त्यांचा अभिनय सुरेख होता. खरे तर रमेश देव “राम राम पाव्हणं’ या चित्रपटातून पहिल्यांदा या क्षेत्रात आले. परंतु संकलकाच्या कात्रीने ही अख्खी व्यक्तिरेखाच उडवून टाकली.त्यानंतर छत्रपती शिवाजी, माय बहिणी, मुकं लेकरू, महाराणी येसूबाई, अशा चित्रपटांतून भूमिका करत, ते धडपडत राहिले.
एवढेच कशाला, “आवारा’ या राज कपूरच्या चित्रपटातही काही दृश्यांमध्ये त्यांनी चिल्लर भूमिका केली. कोल्हापूरचे अनेक कलावंत हिंदी चित्रपटसृष्टीत जाण्यास घाबरत असत. अनेकजण तिकडे जाऊन परत आले. परंतु रमेश देव यांनी संकुचित विश्वापलीकडे जाण्याचे ठरवले आणि आपल्या हसतमुख स्वभावाने माणसे जोडली. मराठी माणूस माणसे तोडण्यात वाकबगार असतो, हे लक्षात घ्या! निळू फुलेंसारखा कलाकार श्रेष्ठ असला, तरी हिंदीत त्यांना यश मिळाले नाही. उलट देव यांना अनेक चित्रपट मिळाले आणि त्यांचे हिंदी उच्चारही उत्तम असत. वासुदेव बळवंत फडके यांच्यावर पूर्वी विश्राम बेडेकर यांनी चित्रपट काढला होता. परंतु याच विषयावर रमेश देव यांनी महाराष्ट्र शासनासाठी चित्रपट निर्माण केला. सामाजिक दृष्टी असल्यामुळेच या विषयास हाता घालावा, असे त्यांना वाटले. “आलिया भोगासी’ असे न मानता, उमदेपणाने आयुष्य जगणारा हा देवमाणूस आता दूर प्रवासाला निघून गेला आहे. त्यांना आदरांजली!