औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व 9 मतदारसंघात युतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. 2014 विधानसभा निवडणुकीत झालेल्या मत विभाजनामुळे औरंगाबाद मध्य मतदारसंघातून “एमआयएम’चा एक उमेदवार निवडून आला होता. तर तो धडा शिवसेनेच्या नेत्यांनी 2019 मधील लोकसभा निवडणुकीत न घेतल्याने 20 वर्षांपासून खासदार असलेले चंद्रकांत खैरे यांचा लाजिरवाणा पराभव झाला होता.
मात्र दोन्ही पक्षांनी या विधानसभा निवडणुकीत अशी कोणतीही चूक न केल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात महायुतीला अभूतपूर्व विजय मिळवता आला. औरंगाबादच्या पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अतुल सावे विजयी 14 हजार मतांनी विजयी झाले आहेत.
फुलंब्रीमधून हरिभाऊ बागडे 15 हजार मतांनी विजयी झाले आहेत. औरंगाबाद पश्चिममधून शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी 40 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे बंडखोर राजू शिंदे यांचा पराभव केला. कॉंग्रेस उमेदवाराचा निवडणूक अर्ज बाद झाल्यामुळे पहिल्यांदाच येथील निवडणूक कॉंग्रेसच्या उमेदवाराशिवाय झाली होती. राजू शिंदे यांच्या व्यतिरिक्त एमआयएमचे अरुण बोर्डे आणि वंचित बहुजन आघाडीचे संदीप शिरसाट यांनीही मोठे आव्हान उभे केले होते.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघातून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा पराभव झाला असून शिवसेनेचे उदयसिंह राजपूत यांचा विजय झाला आहे. हर्षवर्धन जाधव यांना 60 हजार 535 तर उद्यसिंह राजपूत यांना 79 हजार 225 मते मिळाली.