सातारा – राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे सातारा जिल्ह्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. सातारा शहराच्या हद्दवाढीनंतर नगरोत्थान योजनेतून एक रुपयाचा निधी पालिकेला मिळालेला नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव प्रयत्न होताना दिसत नाहीत, अशी परखड टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
जिल्हा दौऱ्यावर आलेल्या दरेकर यांनी साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारीच्या जोरावर राष्ट्रवादीने राजकीय दबदबा ठेवल्याचे सांगितले जाते. त्या कारखानदारीकडेही महाविकास आघाडी सरकारने दुर्लक्ष केले आहे. केंद्र शासनाच्या योजनेमुळे या कारखानदारीला दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच हजार 361 कोटी रुपयांचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी दिले आहे. साखरेला प्रतिक्विंटल सहाशे रुपये प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले आहे. याशिवाय इथेनॉल निर्मितीमधून राज्याला पंधरा हजार कोटी रुपयांचा महसूल मिळाला; परंतु राज्य शासन एफआरपीसंदर्भात ठोस निर्णय घेत नाही. ज्यांच्या जीवावर राजकारण सुरू आहे, त्या साखर कारखानदारांकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
सातारा जिल्ह्यात अनेक कारखाने बंद आहेत. जलजीवन मिशनत भ्रष्टाचार झाला असून, नियम डावलून अनेक संस्थांना कामे देण्यात आली आहेत. या प्रश्नांवर विधानसभेत देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेत मी आवाज उठवणार आहे. महाविकास आघाडी सरकार असून नसल्यासारखे आहे. धनदांडगे, बार, वाइन शॉपवाल्यांच्या साखळीसाठी हे सरकार कार्यरत आहे. शेतकऱ्यांना वाइनचा उपयोग काय? ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणतात की, या सरकारच्या कार्यकाळात मला जगण्याची इच्छा नाही.
त्यांची टिप्पणी अतिशय गंभीर आहे. अवकाळी पावसामुळे सातारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईचा एक रुपयासुद्धा मिळालेला नाही. वाई तालुक्यातील केंजळ येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळा बसवायच्या प्रकरणात राज्य शासनाने धरसोड केली. पोलिसांच्या बंदोबस्तात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला. मुळात हे प्रकरण ताणायची गरज नव्हती. शासनाची ही कृती निंदनीय आहे. संघर्षजन्य परिस्थिती निर्माण करून मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचे शासनाचे धोरण आहे. संजय राऊत यांनी तीन नेत्यांच्या अटकेबाबत विधाने केली होती.
त्याबाबत विचारले असता, दरेकर म्हणाले, राऊत असे गौप्यस्फोट नेहमीच करत असतात. त्यामध्ये गोपनीय काहीच नसते. त्यांची विधाने म्हणजे फुसके बार आहेत. सातारा पालिकेच्या निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले एकत्र लढणार का? भाजपचे एकत्र पॅनेल असेल का, यावर ते म्हणाले, दोन्ही नेते भाजपचे आहेत. या संदर्भात आमचे नेते देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील. या प्रश्नांचा निर्णय प्रदेश पातळीवर होईल. स्थानिक आघाड्यांसंदर्भात आताच बोलणे उचित ठरणार नाही. एसटी महामंडळाच्या विलीनीकरणाबाबत शासनाचे धोरण स्पष्ट नसल्याने कर्मचारी अडचणीत आहेत. या प्रश्नावरही विधानपरिषदेत आवाज उठवणार आहे.