सातारा -सातारा जिल्ह्यातील भूमीपुत्रांनी कामाच्या माध्यमातून पवनचक्की कंपन्यांना मोठे सहकार्य केले आहे. असे असताना कंपनी व्यवस्थापनाने भूमीपुत्रांच्या परराज्यात बदल्या करण्याचे सुरु केलेले अन्यायकारक सत्र ताबडतोब थांबवावे, अन्यथा पवनचक्की कंपन्याचे काम बंद पाडू, असा रोखठोक इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील ठोसेघर, चाळकेवाडी, पाटण या भागामध्ये सुझलॉन कंपनीच्या पवनचक्क्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले गेले असून या माध्यमातून या भागातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र सुझलॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एक नवीन अध्यादेश लागू केला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील जे सुझलॉन कंपनीत काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना इतर राज्यात काम करण्याचे आदेश काढले आहेत. या संदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सुरूची येथे पत्रकारांशी संवाद साधत आपली थेट भूमिका स्पष्ट केली.
कंपनी व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयाबाबत स्थानिक कर्मचाऱ्यांनी आ. शिवेंद्रराजे यांच्याकडे धाव घेत आपली व्यथा त्यांच्या समोर मांडली. शिवेंद्रराजे यांनी सुझलॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांना थेट फोन करून अधिकाऱ्यांनी हे काढलेले आदेश तात्काळ मागे घ्यावेत, असे सुनावले. ते म्हणाले पवनचक्की कंपन्यांनी आंतरराज्य बदल्या करताना स्थानिक भूमीपुत्रांच्या गैरसोयीचा विचार करावा. कोणावरही अन्याय होणार नाही, अशी निर्णय प्रक्रिया राबवावी. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्यांचा विचार केला नाही तर मग आम्हाला आक्रमक धोरण राबवावे लागेल असेही ते म्हणाले. अन्यथा सुझलॉन कंपनीचे सातारा जिल्ह्यात ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणचे सर्व काम मी स्वतः जाऊन बंद पाडणार असल्याचा इशारा यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे.