मुंबई – आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान आपले विचार मांडले. नवनियुक्त राज्यपालांचे अभिभाषण हे मराठी भाषा दिनाच्या दिवशी झाले. त्यांनी भाषणात किमान तीन ओळीतरी मराठीतून बोलणे अपेक्षित होते, परंतु त्यांनी संपूर्ण भाषण हिंदीतून केले. मंत्रिमंडळाने या बाबीचा विचार करायला हवा होता, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारक हे सगळे प्रकल्प या सरकारने बासनात गुंडाळून ठेवले आहेत. या कामांना वेग यावा असे सांगतानाच महात्मा जोतिबा फुले यांचे स्मारकही मुंबईत व्हावे, अशी मागणी त्यांनी केली.
Delhi : राज्यपाल बैस यांनी घेतली गृहमंत्री शाहंची सदिच्छा भेट
तसेच आव्हाड पुढे म्हणाले की, मी गृहनिर्माण मंत्री असताना बीडीडी चाळींसंदर्भातला निर्णय झाला. तिथे अनेक वर्षांपासून जे पोलीस वास्तव्यास आहेत त्यांच्या नावावर ती घरे करून टाका. क्वार्टर्स राहण्यालायक नाहीत इतकी अवस्था खराब झाली असतानाही पोलीस तिथे राहत आहेत. या गंभीर बाबीचा शासनाने विचार करावा, असे आव्हाड म्हणाले. तसेच ओबीसींची जनगणना व्हावी अशी अपेक्षाही आमदार आव्हाड यांनी व्यक्त केली.