भारत-बांगलादेशदरम्यान आज दुसरा सामना
राजकोट: भारत आणि बांगलादेश यांच्यात आज येथे तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना होत आहे. प्रदूषणाच्या भीतीने राजधानीतील सामन्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता, तशीच भीती याही सामन्याबाबत व्यक्त केली जात आहे. महा चक्रीवादळामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने हा सामना होईल का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. आता दुसरा टी-20 सामना आज येथे होणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यावर प्रदूषणाचे सावट होते, आता दुसऱ्या सामन्यावर पावसाचे सावट आले आहे.
बांगलादेशच्या खेळाडूंना प्रदूषणाचा त्रास
नवी दिल्लीतील पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेशने भारताचा पराभव केला होता. या सामन्याला प्रदूषणाचे गालबोट लागले आहे. दिल्लीतील प्रदूषण आणि हवेची नीचांकी पातळी यामुळे सामना अन्यत्र घ्यावा अशी मागणी होत होती, मात्र अखेर तेथेच हा सामना झाला पण त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. या प्रदूषणाचा बांगलादेशी खेळाडूंनाही त्रास झाल्याचे वृत्त आहे. सौम्या सरकार आणि आणखी एका खेळाडूला पहिल्या सामन्यादरम्यान उलट्यांचा त्रास झाल्याचे समोर येत आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी याबाबत अद्याप कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.
दुसऱ्या सामन्यावर वादळीवारे तसेच संततधार पाऊस याचे संकट निर्माण झाले आहे. भारत-बांगलादेश दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वीच या मालिकेबद्दल शंका उपस्थित होत होती. बांगलादेशच्या खेळाडूंनी संप केला होता. दिल्लीतील सामना प्रदूषणामुळे होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. आता येथील सामन्यावर महा वादळाचे सावट आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेले हे वादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार असे संकेत मिळाले आहेत. बुधवारी मध्यरात्री किंवा गुरुवारी पहाटे हे वादळ गुजरात किनाऱ्याला धडकण्याचा अंदाज आहे. या वादळाच्या प्रभावाने ताशी 100 ते 110 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. 120 किलोमीटर प्रतितासपर्यंत वादळाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे हा सामना होणार का नाही याबाबत कोणीही खात्री देऊ शकत नाही.
पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे भारतीय संघात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ गुरुवारी राजकोटच्या मैदानावर दुसरा टी-20 सामना खेळणार आहे. या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात बदल होऊ शकतो असेच संकेत दिले. आमची फलंदाजी चांगली आहे. त्यामुळे यामध्ये काही बदल करावे लागतील असं मला वाटत नाही. मात्र आम्ही खेळपट्टीची पाहणी करू आणि त्यानंतर कोणाला संघात जागा मिळेल याबद्दल निर्णय घेतला जाईल, असेही रोहितने सांगितले. आजच्या सामन्यात मुंबईकर शार्दुल ठाकूरला संघात जागा मिळू शकते.