माधव विद्वांस
आधुनिक मराठी काव्याचे जनक केशवसुत यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1866 रोजी गणपतीपुळ्याजवळील मालगुंड येथे झाला. (निधन ः 7 नोव्हेंबर 1905, हुबळी येथे) त्यांचे वडील केसो विठ्ठल हे प्राथमिक शिक्षक व पुढे रा. सा. मंडलिक यांच्या वेळणे या गावच्या शेतीचे कारभारी होते. त्यांचे बंधू मोरो केशव दामले यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1868 रोजी मालगुंड येथे झाला. त्यांचे बंधू फारसे परिचित नाहीत पण व्याकरणकार म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. 14 वर्षे कष्ट करून त्यांनी शास्त्रीय मराठी व्याकरण (1911) हा आपला एकमेवाद्वितीय ग्रंथराज रचला. एकाच तारखेस एका भावाची जयंती तर दुसऱ्याचे पुण्यस्मरण.
केशवसुत यांचे पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले. काव्यरत्नावली ह्या मासिकाचे संपादक नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेवरून “केशवसुत’ या टोपणनावाचा स्वीकार केला.चाकोरीबाहेर जाऊन त्यांनी आपल्या काव्यरचना केल्या व त्या रसिकांना आवडल्या.शिक्षण सुरू असतानाच 1880 मध्ये त्यांचा विवाह झाला. ते 1889 मध्ये मॅट्रिक झाले. मुंबईला 1897 पर्यंत निरनिराळ्या हंगामी नोकऱ्या केल्या. मुंबई येथे प्लेगची साथ पसरल्याने ते मुंबई सोडून खानदेशात गेले. तेथे भडगावच्या नगरपालिकेच्या शाळेत दुय्यम शिक्षकाची नोकरी केली. 1901 पासून फैजपूरला मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली. 1904 मध्ये धारवाडच्या सरकारी शाळेत मराठीचे शिक्षक म्हणून बदली झाली. 1905 साली हुबळीला गेले असताना प्लेगने त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागून आठच दिवसांनी त्यांच्या पत्नीचे निधन झाले.
त्यांनी नवकाव्याबरोबरच वाचकांमध्ये काव्यविषयक नवा दृष्टिकोन व नवी अभिरुची निर्माण केली. केशवसुतांनी रचलेल्या स्फूर्ती, कवितेचे प्रयोजन, आम्ही कोण?’ आणि प्रतिभा या कविता उल्लेखनीय आहेत. व्यापक मानवी जीवनाचा विचार त्यांच्या कवितेमधून डोकावतो. त्यांच्या निसर्गविषयक कवितांवर वर्डसवर्थ, शेली व किटस् यांच्या विचारांचा परिणाम झालेला दिसतो. त्यांच्या काव्यरचनेवर इंग्रजी कवींचा प्रभाव असला तरी त्यांची काव्यरचना भारतीय शैलीची होती.
चौदा ओळींचा इंग्रजी काव्यातील “सॉनेट’ हा काव्यप्रकार “सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत लोकप्रिय केला. त्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी फक्त 135 कविताच आज उपलब्ध आहेत. भृंग, पुष्पाप्रत व फुलपाखरू या त्यांच्या काही महत्त्वाच्या निसर्गकविता. प्रेमविषयक आत्मनिवेदन करणाऱ्या कविताही केशवसुतांनी लिहिल्या. क्रांतिकारक सामाजिक विचार व्यक्त करणाऱ्या त्यांच्या प्रसिद्ध कविता म्हणजे, तुतारी, नवा शिपाई आणि गोफण केली छान. “काठोकाठ भरू द्या पेला’ या काव्यपंक्तीमधून त्यांची बंडखोरी दिसून येते. काळोखाची रजनी होती ही कविता माझ्या विद्यार्थीदशेत होती. विमनस्क अवस्थेचे यथार्थ दर्शन या कवितेमध्ये होते. गूढ अनुभूती व तिची नावीन्यपूर्ण अभिव्यक्ती असलेली झपूर्झा ही त्यांची कविता विशेष गाजली. त्यांच्या अन्य गूढगुंजनात्मक कवितांत म्हातारी व हरपले श्रेय यांचा समावेश होतो. या महान कविवर्यास अभिवादन.