चिंबळी – खेड तालुक्याच्या दक्षिण भागात शुक्रवार (दि. 27) व शनिवारी (दि. 28) दुपारी चारच्या सुमारास काही प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा आणि काढणीला आलेला गहू भिजल्याने शेतकऱ्यांचे काही अंशी आर्थिक नुकसान झाले.सध्या कांदा, गहू ज्वारी हरभरा काढणीचा मळणीचा हंगाम सुरू आहे.
शेतकऱ्यांनी कांदा काढणीला गेल्या एक महिन्यापासून सुरुवात केली असून काढलेला कांदा शेतातच साठवून ठेवत आहे. तर गहू काढणीला आला आहे; परंतु हार्वेस्टर मशीन मिळत नसल्याने गहू काढणी वाचून शेतात आहे; मात्र शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पळापळ झाली.
शेतात ठेवलेला काही कांदा चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत 10 किलो कांद्याला 180 ते 200 रुपये इतका बाजारभाव मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांनी कांदा झाकून ठेवला होता, ते शेतकरी शेतातच कांद्याच्या पिशव्या भरुन विक्रीसाठी पाठवत आहेत.