मुंबई – महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यासह सहाजणांना दोषमुक्त केले आहे. याप्रकरणी आपल्याविरोधात लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची मागणी भुजबळांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. याबाबत मुंबई सत्र न्यायालयाने आज निर्णय दिला.
दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या निर्णयानंतर हायकोर्टात धाव घेणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नाहीत, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणातून छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, गीता जोशी, संजय जोशी या सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी दोषमुक्तीसाठी कोर्टापुढे अर्ज सादर केला होता. यादोघांसह याच प्रकरणातील अन्य आरोपी पंकज भुजबळ, तनवीर शेख, ईरम शेख, संजय जोशी आणि गीता जोशी यांनाही कोर्टाने दोषमुक्त ठरविले आहे. याप्रकरणात गुन्हा नोंद करताना तांत्रिक बाबींची जाण नसतानाही एसीबीच्या तपास अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे आणि बेकायदेशीरपणे कारवाई केल्याचा ठपकाही न्यायालयाने ठेवला आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांच्या काळात विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाल्याचा आरोप होता. दिल्लीत उभारलेल्या महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळ यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून साडे तेरा कोटींची लाच घेतल्याचा आरोप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आरोपपत्रात करण्यात आला होता.
“आमच्यावर खोटे-नाटे आरोप झाले. आमच्यावर मीडिया ट्रायल झाली. सव्वा दोन वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगात राहावे लागले. या प्रकरणात एका पैशाचाही घोटाळा झाला नाही हे आम्ही वारंवार सांगत होतो. तेच आम्ही न्यायालयात सांगितले. आज आम्हाला त्या केसमधून निर्दोष मुक्त केले आहे. “सत्य परेशान हो सकता हैं, पराजित नहीं.'”
– छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
हायकोर्टात धाव घेणार- अंजली दमानिया
“सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी या निर्णयानंतर हायकोर्टात धाव घेणार असल्याचे म्हटले आहे. छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांना सेशन कोर्टाकडून महाराष्ट्र सदन केसमधून मुक्तता केली आहे. मी या निर्णयाला हायकोर्टात चॅलेंज करणार आहे, असे दमानिया यांनी म्हटले आहे.”