मुंबई :- शिवसेनेच्या ठाकरे गटाने आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 48 लोकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत ते दररोज वेगवेगळ्या लोकसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करत आहेत. त्यांना भेटत आहेत.
मातोश्रीवर गुरुवारी अहमदनगर लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यात आला. त्यात उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर दक्षिण मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजप खासदार सुजय विखे पाटलांचा पराभव करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
अहमदनगर दक्षिण मतदार संघात महाविकास आघाडीने कोणताही उमेदवार दिला तरी आपण त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे रहायचे. त्या उमदेवाराला साथ द्यायची. आपल्याला सुजय विखे पाटलांचा पराभव करायचा आहे, त्यासाठी तयारीला लागा, असे ते म्हणाले.
दरम्यान, नगर जिल्ह्यात नगर व शिर्डी या 2 लोकसभा मतदार संघांत विधानसभेच्या अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव-पाथर्डी, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड या 12 जागा आहेत. या सर्व मतदार संघातील मोर्चेबांधणी आजच्या मातोश्रीवरील बैठकीत करण्यात आली.
जळगावच्या दोन्ही जागांचे प्लॅनिंग..
जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील पक्षसंघटना मजबूत करण्याचे निर्देश दिले. या ठिकाणीही त्यांनी लोकसभेच्या दोन्ही जागांसह 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये तयारी सुरु करण्याच्या सूचना केल्या.
सद्यस्थितीत जळगावातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे, तर जळगावमध्ये उन्मेश पाटील खासदार आहेत. जळगावातून शिवसेनेचे 4 आमदार निवडून आले होते. गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर पाटील व लता सोनावणे यांचा यात समावेश होता. पण सध्या हे चौघेही शिंदे गटात गेले. त्यामुळे आता या जागांवर नवे उमेदवार देऊन त्यांना निवडून आणण्याचे आव्हान ठाकरे गटापुढे आहे.