मुंबई :- “पृथ्वीराज चव्हाण कोणाबद्दल काय बोलत आहेत, याचे त्यांना भान नाही. त्यांचे वक्तव्य पोटकटपणाचे आहे,’ अशी जहरी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. तसेच शरद पवारांना सोबत घेण्यासंदर्भात ना आम्ही भाजपला कोणता प्रस्ताव दिला आहे, ना भाजपने आमच्याकडे असा कुठला प्रस्ताव दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
तसेच यावेळी तटकरे यांनी कॉंग्रेससह ठाकरे गटातील नेत्यांवरही जोरदार टीका केली. विजय वडेट्टीवार, नाना पटोले आणि ठाकरे गटातील काही नेते सध्या सभ्यता सोडून बोलत आहेत. सध्या विरोधक संकुचित वृत्तीने टीका करत आहेत, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, अजित पवार यांच्या गटाने काल नवाब मलिक यांची भेट घेतली. या भेटीविषयी माहिती देताना तटकरे म्हणाले की, नवाब मलिक यांच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यांच्या प्रकृतीसंदर्भात आम्ही भेटण्यासाठी गेलो होतो. आम्ही भाजपसोबत जाणे आणि नवाब मलिक यांना जामीन मिळणे याचा दुरान्वये संबंध नाही, असेही त्यांनी सांगितले.
तसेच, जयंत पाटील त्यांच्या भूमिकेबाबत स्वतः सांगतील कसा करेक्ट कार्यक्रम करायचा हे त्यांना चांगलं माहिती आहे, असे सूचक वक्तव्य देखील तटकरे यांनी केले. तसेच, अजित पवार लवकरच महाराष्ट्र दौऱ्यावर बाहेर पडणार आहेत. तत्पूर्वी कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यासाठी त्या संघटनात्मक बैठका सुरु आहेत, असेही तटकरे पुढे बोलताना म्हणाले.
काय म्हणाले होते?
पृथ्वीराज चव्हाण हे अजित पवार आणि शरद पवार यांच्या झालेल्या भेटीवर बोलताना म्हणाले की, अजित पवार भाजपसोबत सत्तेस सामील झाल्यानंतर शरद पवारही त्यांच्यासोबत येतील अशी शक्यता भाजपला वाटत होती. पण अजूनपर्यंत तरी तसे काही घडले नाही. त्यामुळे केंद्रातील भाजपच्या सत्तेमध्ये सामील होण्यासाठी शरद पवारांना दोन मोठ्या ऑफर देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय कृषीमंत्रीपद आणि निती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर त्यांना देण्यात आली आहे. अजित पवारांनी पुण्यात शरद पवारांची चोरडिया यांच्या निवासस्थानी घेतलेल्या या भेटीत या ऑफरबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे. पण शरद पवारांनी भाजपची ही ऑफर नाकारली.