मुंबई :- भारतीय संघाचा टी-20 कर्णधार हार्दिक पंड्याची कर्णधारपदाची तसेच वैयक्तिक कामगिरी सातत्याने सुमार होत आहे. गोलंदाजीत त्याने काही प्रमाणात यश मिळवले असले तरीही एक अष्टपैलु म्हणून फलंदाजीत त्याला वारंवार अपयश येत आहे.
संघातील प्रयोग देखील कुचकामी ठरत आहेत. पंड्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात व्यस्त आहे. मात्र, त्याचे गांभीर्य त्याच्या देहबोलीतून कुठेही दिसून येत नाही. सध्या सामन्यानंतर बोलण्यापूरताच तो गंभीर असल्याचे दिसत आहे. आयपीएल स्पर्धेनंतर पंड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी-20 सामन्यात एक नाबाद 70 धावांची खेळीच त्याच्या नावावर आहे. त्यानंतर एकदाही पंड्याला 50 धावांच्या जवळपास खेळी करता आलेली नाही. या मालिकेत त्याने 4 डावात केवळ 77 धावा केल्या आहेत.
2022 सालच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर त्याची कामगिरी सातत्याने खालावली आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी 59 सामन्यांत त्याने 3 अर्धशतकांच्या मदतीने 1117 धावा केल्या आहेत. मात्र, 2022 सालानंतर पंड्या साफ अपयशी ठरताना दिसत आहे. गेल्या 12 डावांत त्याने केवळ 231 धावा केल्या आहेत.