महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. महाविकास आघाडी सरकार सध्या अल्पमतात गेल्याची चर्चा सुरु आहे. त्याचप्रमाणे मंत्री शिंदेंसोबत असलेले सेनेचे ते ३३ आमदार नेमके कोण असा सवाल देखील विचारला जात होता. आता या बंडखोर आमदारांची नावे समोर आली आहेत.
एकनाथ शिंदे यांनी पहाटेच सुरतेहून गुवाहाटीला प्रस्थान केलं. त्यावेळी शिंदे यांच्यासोबत सेनेचे ३३ आणि अपक्ष ७ असे एकूण ४० आमदार असल्याचे स्पष्ट झाले. तत्पूर्वी शिंदे यांना भेटायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर सुरतमधील हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये सुमारे अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी झालं बोलणं
मिलिंद नार्वेकर याच्यासोबतच शिंदे यांच्याशी मुख्यमंत्री ठाकरे यांची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र या चर्चेत काही तोडगा निघू शकला नाही. कारण चर्चेनंतर शिंदे यांच्यासह ४० आमदार सुरतहुन थेट गुवाहाटीला दाखल झाले. तत्पूर्वी शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना आपल्यासोबत ४० आमदार असल्याचे स्पष्ट केले. तसेच आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर चालणार असल्याचेही सांगितले.
हे आमदार आहेत शिंदे यांच्यासोबत
अनिल बाबर (खानापूर),महेश शिंदे (कोरेगाव), शहाजी पाटील (सांगोळा), लता सोनावणे (चोपडा), यामिनी जाधव (भायखळा), बालाजी किनीकर (अंबरनाथ), संदिपान भुमरे (पैठण), अब्दुल सत्तार (सिल्लोड), नितीन देशमुख (अकोला),संजय रायुलकर (मेहकर), संजय गायकवाड (बुलढाणा), एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखाडी), विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम), ज्ञानराजे चौघुले (उमरगा), रमेश बोरणारे (विजापूर), तानाजी सावंत (परांडा), महेंद्र थोरवे (कर्जत), भरत गोगावले (महाड), महेंद्र दळवी (अलिबाग), सुहास कांदे (नांदगाव), संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम), प्रदीप जयस्वाल (औरंगाबाद मध्य), शंभूराज देसाई (पाटण), बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर), प्रताप सरनाईक (ओवळा-माजीवाडा), प्रकाश अबिटकर (राधानगरी), चिमणराव पाटील (एरंडोल), श्रीनिवास वनगा (पालघर), नरेंद्र बोंडेकर (भंडारदरा), प्रकाश सुर्वे (मागाठणे), किशोर पाटील (जळगाव), राजकुमार पटेल (मेळघाट), शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण)
पैठण, भायखळा, भंडारदरा आणि अंबरनाथ पर्यंतचे हे सर्व आमदार आहेत. या आमदारांच्या बंडामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीला चांगलाच घाम फुटला आहे. या सर्व आमदारांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर नाराजी होती म्हणून त्यांनी बंडखोरी केली असल्याचं बोललं जात आहे. महाविकास आघाडी आता हे बंड कसं क्षमवणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे.