मुंबई – महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना येत्या वर्षात देशांतर्गत स्पर्धेतील सर्वात मानाची समजली जात असलेल्या महाराष्ट्र कबड्डी लीगचे पुनरुज्जीवन करणार आहे. गेल्या वर्षीपासून करोनामुळे या लीगसह अनेक स्पर्धा होऊच शकल्या नाहीत.
संघटनेलाही प्रचंड तोटा झाला. या सगळ्या गोष्टींना मागे टाकून संघटना नव्या उमेदीने सर्व स्पर्धा घेण्यासाठी अनुकूल असून त्याची सुरुवात राज्य स्पर्धेपासून होणार आहे. संघटनेची घटना दुरुस्तीबाबत नुकतीच ऑनलाइन बैठक झाली.
नव्याने तयार करण्यात आलेली घटना जवळपास मान्य झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, काही सदस्यांची प्रत्यक्ष सभा घेऊन घटना दुरुस्तीवर शिक्कामोर्तब करावे, अशी मागणी केली.
त्यास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संमती दिली असून येत्या 21 सप्टेंबर रोजी प्रत्यक्ष बैठक होणार आहे. राज्य कबड्डीसाठी महाराष्ट्र कबड्डी लीग महत्त्वाची ठरली होती.