नवी दिल्ली – विराट कोहली याची मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठीच्या संघाच्या कर्णधारपदावरून गच्छंती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय संघाचे नेतृत्व स्वीकारल्यापासून कोहलीला आयसीसीच्या एकाही स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आलेले नाही.
येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये होणारा टी-20 विश्वकरंडक जिंकण्यात जर भारतीय संघ अपयशी ठरला, तर मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद कोहलीकडून काढून घेतले जाऊ शकते आणि रोहित शर्माकडे ही जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कोहली यशस्वी झाला आहे, पण संघ त्याच्या नेतृत्वाखाली मर्यादित षटकांच्या आयसीसीच्या स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरत आहे.
आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व कोहली करेल. याआधीही तो कर्णधारपदावरून अनेकवेळा चर्चेत आला आहे. विशेषत: एक मजबूत संघ असूनही आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयश आल्यानंतर कोहली आपले कर्णधारपद गमवू शकतो. भारताचा न्यूझीलंडकडून इंग्लंडमधील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात पराभव झाल्यापासून बीसीसीआयचे अधिकारी या विषयावर चर्चा करत आहेत. हे अधिकारी भारतीय कर्णधाराच्या संघ निवडीवर नाखूष होते.
या सामन्यात कोहलीने वेगवान गोलंदाजांना अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर दोन फिरकीपटू खेळवले. कोहलीच्या कर्णधारपदाबद्दल बीसीसीआय खूप चिंतित आहे. तो आयसीसी स्पर्धांमध्ये कर्णधार म्हणून अपयशी ठरला आहे. डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यानंतर जुलैमध्ये बीसीसीआय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत असे दिसून आले, की बीसीसीआयचे अनेक अधिकारी कोहलीच्या कर्णधारपदावर असमाधानी आहेत.