पुणे – महाराष्ट्र एकमेव राज्य आहे, जिथे महिला उद्योग धोरण तयार करण्यात आले. आगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उद्योजक महिलांची परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ऍन्ड ऍग्रिकल्चर, राज्य उद्योग विभाग आणि एमआयडीसी यांच्या विद्यमाने सिंचन भवन मैदानावर आयोजित महाराष्ट्र इंटरनॅशनल ट्रेड “मायटेक्स एक्स्पो’ या प्रदर्शनाला डॉ. गोऱ्हे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योजकांसोबत संवाद साधला. यावेळी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, करुणाकर शेट्टी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, शासन शंभर टक्के उद्योजक आणि व्यापाऱ्यांसोबत आहे. उद्योजक व व्यापाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत सर्व विभागांचे अधिकारी, सचिवांसोबत बैठक घेतली जाईल. राज्य शासन आणि महाराष्ट्र चेंबर राज्यातील व्यापार आणि उद्योगांच्या वाढीसाठी संयुक्तपणे काम करत असल्याचे सामंत यांनी सांगितले. प्रकल्प उभारताना तेथील स्थानिकांना 80 टक्के प्राधान्य दिल्यास वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत.
ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबर व्यापारी आणि उद्योजकांसाठी कार्यरत आहे. मायटेक्सच्या माध्यमातून राज्यातील
व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राला चालना, प्रोत्साहन देण्यात येत आहे. शासनाकडून तत्काळ निर्णय घेतले जात असल्याने उद्योगक्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी आर्यन ग्रुपचे चेअरमन मनोहर जगताप, मायटेक्सचे मुख्य संयोजक दिलीप गुप्ता यांचा सत्कार केला. यावेळी अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
“मुंबई येथील डायमंड ज्वेलरी हब गुजरातमध्ये स्थलांतरित होत असल्याचा प्रचार चुकीचा आहे. राज्य शासनाने डायमंड ज्वेलरीमध्ये धोरण आणले असून, नवी मुंबई येथे नव्याने विकसित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ जागाही दिली आहे.”- उदय सामंत, उद्योगमंत्री