मुंबई – दहावी आणि बारावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे या विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामध्ये भर म्हणजे या मुलांची परीक्षा आता ऑफलाइन घेतली जाणार आहे.
परंतु जे विद्यार्थी कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा देऊ शकणार नाहीत. अशा विद्यार्थांसाठी आता दिलासादायक बातमी आहे. कारण या विद्यार्थांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
जे विद्यार्थी कोरोनाबाधित आहेत किंवा ज्यांच्या घरात, परिसरात, कोरोना रुग्ण असतील आणि त्यामुळे त्यांचा विभाग सील केला असेल. यामुळे तेथील मुलांना घोषित वेळापत्रकानुसार परीक्षा देता आली नाही. तर अशा विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
यंदा घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार जे दहावी-बारावीचे विद्यार्थी परीक्षा देऊ शकणार नाहीत. अशा विद्यार्थ्यांच्या संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला पोहचवायची आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान न होता त्यांना जूनमध्ये परीक्षा देता येईल, असं गायकवाड यांनी सांगितलं आहे.
तत्पुर्वी बोर्डाची इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान आणि इयत्ता बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे या नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहेत. या परीक्षेबाबत काही मह्त्वाचे निर्णय या अगोदरच घेण्यात आले आहेत.
दरम्यान या वर्षी विद्यार्थांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने अर्धातास वेळ वाढवून देण्यात आला आहे. त्यामुळे 80 गुणांच्या पेपरसाठी साडेतीन ताासाचा वेळ दिला आहे. त्याचबरोबर 40 व 50 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटांचा वेळ वाढवला आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षेसाठी प्रत्येकी घड्याळी तासासाठी 20 मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल.