Milind Deora| महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. यात शिवसेना ठाकरे गटाला 21, काँग्रेसला 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 10 जागा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी ठाकरे गटासह काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या दलित असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मध्य मुंबईची जागा त्यांना सोडण्यास नकार दिल्याचे ट्वीट करत देवरा यांनी म्हंटले आहे.
मिलिंद देवरा यांचे ट्वीट – Milind Deora|
“दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि ठाकरे गटाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते. ठाकरे गट महाराष्ट्रात २१ जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र त्यात केवळ एका जागेवर ठाकरे गटाने दलित उमेदवाराला संधी दिली आहे. आम्ही या निवडणुकीत तीन दलित उमेदवारांना संधी दिली आहे. महाविकास आघाडीत दलित उमेदवारांची प्रतारणा सुरु आहे. कारण काँग्रेस आणि ठाकरे गटात दलित समाजबांधवांना स्थान आणि मान नाही आणि खुल्या मतदारसंघातून दलित उमेदवार उभा करण्याची त्यांच्यात हिंमत नाही.”
दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि उबाठा गटाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते. उबाठा गट महाराष्ट्रात २१ जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र त्यात केवळ एका जागेवर उबाठा गटाने दलित उमेदवाराला संधी दिली आहे. आम्ही या निवडणुकीत तीन दलित उमेदवारांना…
— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) April 19, 2024
पुढे ते म्हणाले, “निवडणुकीत दलित समाजाची मते हवीत, पण या समाजाला नेतृत्वाची संधी द्यायची नाही, अशी दुटप्पी भूमिका उबाठा गटाची दिसून येते. माझ्याकडे माहिती आहे की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला असे कळविले की वर्षा गायकवाड यांना खुल्या जागेवर (दक्षिण-मध्य मुंबई) तिकिट दिले तर दलित असल्यामुळे त्यांचा पराभव होईल. एक सुशिक्षित, सक्षम आणि राजकारणात आपल्या कामगिरीने ठसा उमटवणाऱ्या वर्षा गायकवाड यांच्याबाबत जे राजकारण होत आहे ते दुर्देवी आहे. अशा मानसिकतेचा मी निषेध करतो,” असेही देवरा यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
महाविकास आघाडीत मुंबईतील सहा मतदारसंघांचे जागा वाटप कसे आहे? Milind Deora|
महाविकास आघाडीत मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई हे चार मतदारसंघ ठाकरे गटाला मिळाले आहे. तर उत्तर-मध्य मुंबई व उत्तर मुंबई या दोन जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर शरद पवार गटाकडे मुंबईतील कोणताही मतदार संघ नाही.
हेही वाचा:
स्वत:ची कार नाही, रोख फक्त 24 हजार रुपये; अमित शाह यांची एकूण संपत्ती किती?