मुंबई – कोव्हिड-19 ची महामारी आणि या रुग्णांमध्ये अलीकडील काळात झालेली वाढ यामुळे एकूणच आरोग्ययंत्रणेसमोर अभूतपूर्व आव्हान उभे ठाकले आहे.
विशेषतः क्षयरोग कार्यक्रमावर याचा परिणाम झाला आहे. इतके मोठे आव्हान असूनही, गरजूंना क्षयरोगासाठी आरोग्यसुविधा उपलब्ध व्हाव्या याची खात्री करण्यासाठी महाराष्ट्र क्षयरोग कार्यक्रमाने अनेक महत्त्वाच्या उपाययोजना केल्या, असे राज्य क्षयरोग कार्यालयाने आयोजित, कुटुंब कल्याण विभागाच्या, आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या.
देशभरात क्षयरोग कार्यक्रम व्यवस्थापक आणि प्रत्यक्ष काम करणारे अधिकारी यांनी कोव्हिड-19 शी लढा दिला. संसर्गजन्य रोगांच्या व्यवस्थापनात असलेल्या त्यांच्या कौशल्यामुळेच हे शक्य झाले. या व्यतिरिक्त, कोव्हिड-19 च्या चाचण्यांसाठी क्षयरोग निदान यंत्रांचा, जेनएक्स्पर्ट आणि ट्रूनॅट यांचा वापर करण्यात आला.
मात्र मनुष्यबळ आणि निदान उपकरणांचा वापर कोव्हिड-19 ला सामोरे जाण्यासाठी करण्यात आल्यामुळे क्षयरोग सेवांवर विपरीत परिणाम झाला. जनसामान्यांमध्ये खोकला या सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या लक्षणाबद्दल असलेली भीती आणि कलंकाची भावना यामुळे सरकारदफ्तरी नोंदणी झालेल्या क्षयरुग्णांच्या संख्येत बऱ्यापैकी घट झाली. कोव्हिडपूर्व काळात महाराष्ट्रात दर महिन्याला सरासरी 19 हजार क्षयरुग्णांची नोंद होत असे, ती कमी होऊन एप्रिल 2021 मध्ये सुमारे 10 हजार रुग्णांची नोंद झाली.
डॉ. पाटील पुढे म्हणाल्या, कोव्हिड-19 चा क्षयरोग उपचारसेवांवर झालेला परिणाम आणि नोंदींमध्ये झालेली घट यांची दखल घेत आम्ही क्षयरोगासंबंधीच्या सेवा सुरू राहतील याची खातरजमा करण्यासाठी अनेक नावीन्यपूर्ण धोरणे विकसित केली आणि त्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली.
विद्यमान रुग्णांना घरपोच औषधे पोहचविणे, क्षयरोगाच्या निदानासाठी मदत मिळावी, यासाठी खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांशी भागीदारी, सामाजिक स्तरावर सहभाग या उपाययोजना राबविण्यात आल्या. त्याचप्रमाणे द्वि-दिशात्मक तपासण्यांसह महत्त्वाची धोरणे राबविण्यात आली, जेणेकरून प्रत्येक क्षयरुग्ण आढळला जाईल आणि त्याची या कार्यक्रमात नोंद होईल.
महाराष्ट्र सरकारने काही महत्त्वाच्या उपाययोजना राबविल्या. यात विविध प्रशासनिक पातळ्यांवर नियमित लक्ष ठेवणे व पर्यवेक्षण, रुग्णांना औषधांची घरपोच डिलिव्हरी, क्षयरोग उपचार आणि सक्रीय रुग्ण शोध अभियांनांमध्ये खासगी आरोग्य क्षेत्राचा सहभाग या उपाययोजनांचा समावेश आहे. एसीएफ अभियानांतर्गत आठ कोटींहून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली. सुमारे 3.33 लाख संभाव्य क्षयरुग्ण निश्चित केले आणि जानेवारी 2021 पर्यंत 12,833 क्षयरुग्णांचे निदान करण्यात आले.
क्षयरोगाचे नियंत्रण आणि निर्मूलन यासाठी नावीन्यूपर्ण धोरणांची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र क्षयरोग कार्यक्रम आघाडीवर आहे. आमचा अनुभव क्षयरोग व कोव्हिड-19 शी संयुक्तपणे लढा देताना आम्हाला कामी येत आहे, असे महाराष्ट्राचे राज्य क्षयरोग अधिकारी डॉ. अडकेकर राज्यासाठीचा रोडमॅप जाहीर करताना म्हणाले.