पुणे – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अखेर महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या
आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार आहे. प्रत्येक विषयासाठी 100 गुणांचे मुल्यमापन होणार आहे. यात इयत्ता नववीच्या अंतिम परीक्षांच्या विषयनिहाय निकालातील 50 टक्के व दहावीतील अंतर्गत मुल्यमापनासाठी 50 टक्के गुण याप्रमाणे दहावीचा अंतिम निकाल लावण्याचे सूत्र निश्चित झाले आहे.
जून अखेरपर्यंत निकाल जाहीर होणार आहे. करोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे लावण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. यानुसार अंतर्गत मूल्यमापनाचा आराखडा निश्चित झाला आहे. तो शुक्रवारी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला.
निकालाचा लेखी आराखडा ही शासन निर्णयाद्वारे जारी झाला आहे. करोनामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीत सर्वसमावेशक असे निकालाचे धोरण तयार करताना विभागातील तज्ज्ञ, मुख्याध्यापक, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक संघटना, तंत्रज्ञान कंपन्या यांच्याशी सुमारे 24 विविध बैठकांद्वारे चर्चा करण्यात आली.
सर्व घटकांशी सखोल चर्चा करून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणदान करण्याबाबतचे खालील धोरण निश्चित केले आहे. या मूल्यमापन धोरणानुसार विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे 100 गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल.
विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल तर त्यांना करोना परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ट होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची निकाल समिती गठीत करावी लागणार आहे. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. शाळास्तरावर गैरप्रकार अथवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.
राज्य मंडळामार्फत जूनअखेर निकाल घोषित करण्याबाबतचे नियोजन करावे लागणार आहे. त्याकरता विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेळापत्रक मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल. सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे.
फेरपरीक्षा देणारे विद्यार्थी, खासगी प्रविष्ट, तुरळक विषय घेऊन बसणारे विद्यार्थी यांच्यासाठीदेखील मूल्यमापन धोरण निश्चित करण्यात आले आहे.पुन र्परीक्षार्थीसाठी मूल्यमापनाचे कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. यात राज्य मंडळाच्या यापूर्वीच या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विषयांमध्ये लेखी परीक्षेत प्राप्त गुणांच्या सरासरी साठी 80 गुण व दहावीचे अंतिम तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेतील अंतर्गत मुल्यमापनासाठी 20 गुण असे निकष ठरवले आहेत.
खासगी विद्यार्थ्यांसाठी ही कार्यपद्धती ठरवली आहे. यात संपर्क केंद्रामार्फत आयोजित सराव चाचण्या पूर्ण केलेल्या स्वाध्याय पुस्तिका, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एक किंवा अधिक बाबींसाठी प्राप्त झालेल्या गुणांचे विषय निहाय 80 पैकी गुणात रुपांतर करण्यात येणार आहे. मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अंतिम तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापनासाठी 20 पैकी गुण देण्यात येणार आहे.
शाळांकडून विविध मूल्यांकन प्रक्रियेद्वारे निकाल तयार करण्यात येणार असल्याने अंतर्गत मूल्यमापनासाठी ग्राह्य धरलेल्या प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, अन्य मूल्यमापन परीक्षांच्या उत्तर पत्रिका विद्यार्थ्यांना दाखविल्या किंवा घरी दिल्या जात असल्याने गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायांकित प्रती मिळणे, पुनर्मूल्यांकन या सुविधा परीक्षेसाठी कोणत्याही स्तरावर उपलब्ध नसतील असेही शासन निर्णयात नमूद आहे. निकालाच्या आधारे राज्य मंडळाकडून गुणपत्रक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.