मुंबई – राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 30 हजार 535 नवीन करोनाबाधितांचे निदान झाले असून 99 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 11 हजार 314 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
आजच्या आकडेवारीनंतर आता राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 2 लाख 10 हजार 120 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.15 टक्के इतका आहे. आतापर्यंत एकूण 22 लाख 14 हजार 867 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यातील बरे होण्याचे प्रमाण 89.32 टक्के आहे.
जिल्हानिहाय सक्रिय बाधितांची आकडेवारी –
राज्यात सध्या 2 लाख 10 हजार 120 अॅक्टिव्ह रुग्ण झाले आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक 42 हजार 15 रुग्ण आहेत. तर नागपूर जिल्ह्यातील 29 हजार 771 रुग्ण आहेत. मुबई पालिका हद्दीतील 22 हजार 81, ठाणे जिल्ह्यात 19 हजार 788, नाशिकमध्ये 15 हजार 619, अमरावती 3 हजार 533, औरंगाबाद 13 हजार 686, जळगावमध्ये 6 हजार 518, अहमदनगर 4289, कोल्हापुर 510, तर गडचिरोली जिल्ह्यात 314 सक्रिय बाधित आहेत.