पुणे – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देशभरातून “मेरी माटी मेरा देश’ अभियान राबविण्यात आले. या अभियानातून संकलित झालेल्या अमृत कलशाचे एकत्रीकरण 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता पुण्यात कॉलेज ऑफ इंजिनियरिंग (सीओईपी) येथे होणार आहे. कार्यक्रमासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित राहणार आहेत.
या अभियानाअंतर्गत हजारो हातांनी गोळा केलेली माती प्रतीकात्मक स्वरूपात अमृत कलशामधून जमा करण्यात येत आहे. महाविद्यालयांमधील उपक्रमातून जमा झालेले अमृतकलश प्रातिनिधिक स्वरूपात नड्डा यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे. येत्या काळात देशभरातून येणारे अमृत कलश दिल्लीमध्ये एकत्रित करण्यात येतील आणि त्यातून देशाच्या एकात्मतेचे प्रतीक असलेली अद्वितीय अमृतवाटिका उभी राहणार आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य सल्लागार तथा “मेरी माटी मेरा देश’ अभियानाचे प्रदेश संयोजक राजेश पांडे यांनी केले आहे.
भावी पिढीला आपल्या देशाचा, आपल्या शहिदांचा जाज्वल्य इतिहास कळण्यासाठी अभियान राबविण्यात आले. आतापर्यंत राज्यभरातील 22 विद्यापीठांतील 1517 महाविद्यालयांनी 4176 गावांतून अमृत कलश गोळा केले आहेत. शाळा, कॉलेज, गावे, स्मारके अशा ठिकाणी नागरिकांना पंचप्रणची शपथ विद्यार्थ्यांमार्फत देण्यात आलेली आहे. या अभियानाचा विश्वविक्रम व्हावा यासाठी “सेल्फी विथ मेरी माटी’ हा उपक्रम देखील एनएसएसद्वारे राबवला गेला. यात 57 हजार लोकांनी आपला माती सोबतच सेल्फी आपलोड करून अभियानात भाग घेतला आहे. अजूनही यात लोकांचा सहभाग वाढतच आहे. – राजेश पांडे, राज्य सल्लागार, एनएसएस (प्रदेश संयोजक, मेरी माटी मेरा देश)