चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल 73 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात 13 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून आता ओळखला जाऊ लागला आहे. सन 2001 ते 2023 या कालावधीत जिल्ह्यात एकूण 1,148 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचा समावेश असलेल्या समितीने 2001 ते 2022 या कालावधीत आत्महत्या केलेल्या 745 शेतकऱ्यांना शासकीय नुकसान भरपाईसाठी पात्र घोषित केले होते तर 329 मयत शेतकऱ्यांना अपात्र घोषित केले होते, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे प्रस्ताव पाठवला असून डिसेंबर 2022 पासून नुकसान भरपाईची 48 प्रकरणे प्रलंबित आहेत.
पीक नुकसान, कर्जफेडीतील अपयश, नापिकी अशा विविध कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करतात. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून एक लाख रुपयांची मदत दिली जाते. यावर्षी जून-जुलैमध्ये आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील 64,379 शेतकऱ्यांच्या एकूण 54,514.65 हेक्टरवरील पिकांचे नुकतेच नुकसान झाले, अशी माहिती कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
ते म्हणाले की, जिल्ह्यातील एकूण 852 गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. गोंडपिपरी तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत एकूण 3,51,091 शेतकऱ्यांनी 1 रुपया प्रिमियम भरून पीक विमा काढला आहे. ज्यात कर्ज घेतलेल्या 50,890 शेतकऱ्यांचा आणि 3,00,201 बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. पीक विमा योजनात जिल्ह्यात एकूण 3,28,155.26 हेक्टर पिकाचा विमा उतरवण्यात आला आहे.