परभणी :- परभणीमध्ये विकासाची गंगा आणणार. आम्ही हा कार्यक्रम पाटणपासून सुरु केला पण काही लोक पाटण्यात जमले आणि द्वेषाची खिचडी शिजवू लागले’, असेही म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
परभणी येथे आयोजित “शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उपस्थित होते. शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आतापर्यंत दीड कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाला असल्याची माहितीही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे काम होत असून त्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळत आहे. आतापर्यंत 22,000 ट्रॅक्टर्सचे वाटप करण्यात आले आहे. तर 22,500 रोटर व्हेटर शेतकऱ्यांना वाटले आणि चार लाख लाभार्थ्यांना 1351 कोटी रुपयांचे वाटप आतापर्यंत करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
तसेच महिलांसाठी केवळ बचतगटच नाही तर शक्तिगट आपल्याला तयार करायचे आहे. महिलांसाठी अनेक विशेष योजनांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना त्यांचे कुटुंब सांभाळताना स्वत:च्या पायावर उभे करण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. महिला बचत गटाची योजना देखील अधिक मजबूत करण्याचे काम शासन आता करणार आहे, असे शिंदे म्हणाले.
ऑनलाईनवरून थेट लाईनवर आणले..
काही लोक घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाईन करत होते. परंतु आम्ही त्यांना एक झटका दिला आणि ऑनलाईनवरुन त्यांना थेट लाईनवर आणले आहे, असे म्हणत शिंदे यांनी भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीकास्र सोडले. तुमचा भोंगा हा कायम शिव्या-शाप देण्यासाठी वाजतो. पण आमचा भोंगा हा शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांसाठी वाजतो, असेही म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
दुष्काळ पाहू देणार नाही- फडणवीस
पावसाचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यातील गोदावरी खोऱ्यात आणायचा आहे. त्यामुळे मराठवाड्यातील मागील पिढीने दुष्काळ पहिला असून, पुढील पिढीला मात्र दुष्काळ पाहू देणार नसल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मराठवाड्याला प्रत्येक चार वर्षांनी दुष्काळाचा सामना करावा लागतो. 2014 साली 53 टक्के पाऊस होता.
2018 साली 64 टक्के पाऊस होता. आता देखील 50 टक्क्यांच्या जवळपास पाऊस पडला आहे. त्यामुळे मराठवाड्याला कायमचा दुष्काळमुक्त करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी काही उपाययोजना केल्या असून, मराठवाडा ग्रीड योजना आणली. यामुळे मराठवाड्यातील धरणे एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.